सिंधुदुर्ग : नाणार रिफायनरीवरून कोकणात सध्या राजकिय घडामोडींना वेग आला आहे. नाणारवरून उद्धव ठाकरेंनी यू टर्न घेतल्यानं आधीच स्थानिक शिवसैनिक नाराज आहेत. याचा फायदा घेत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात खिंडार पाडण्याचा भाजपचा प्लॅन आहे. या मिशनची जबाबदारी चार नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. यासाठी आशिष शेलार, प्रसाद लाड, नारायण राणे, निलेश राणे यांचे कोकणात दौरे, कार्यक्रम सुरू आहेत.
नाणार रिफायनरीवरून आरोप-पत्यारोप सुरु असतानाच दोन माजी मंत्री आणि एक आमदार भाजपच्या संर्पकात असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रामुळे शिवसेनेत नाराजी आहे. आणि याचाच फायदा भाजप घेत कोकणातले नाराज शिवसेना नेते, आमदार गळाला लावण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक पाहता भाजपने मेगा प्लॅन तयार केला आहे. मुंबई मगानगरपालिकेच्या निवडणूका झाल्यानंतर कोकण हाती घेण्याचा मेगा प्लॅन भाजपने हाती घेतला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्यात भाजप सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धोपेश्वर-बारसू भागात रिफायनरी प्रकल्पासाठी राज्य शासन अनुकूल असल्याचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जानेवारीतच दिले होते. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे पूर्वीपासूनच रिफायनरीला समर्थन आहे. त्यामुळे राजापुरात ग्रीन रिफायनरी प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याचे भाजपकडून बोलेल जात आहे.