कोकणातला शिमगोत्सव

Share
  • दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम

कोकणात सध्या चैतन्य, उत्साह, आनंद पसरला आहे कारण, फाक पंचमीपासून होळीचे वेध प्रत्येक कोकणवासीयांना लागले आहेत. फाक पंचमीला कोकणातील अनेक गावांमध्ये आंब्याच्या, शेवरीच्या होळ्या उभ्या राहिल्या आहेत. रात्री टीव्हीमध्ये किंवा अन्य कुठे अडकलेला गावातला तरुण वर्ग आता रोज रात्री या होळीभोवती जमू लागला आहे. गावागावात जोरजोरात फाका घातल्या जाऊ लागल्या आहेत. कधी काळी कुणाचं भांडण झालं असेल, त्यांच्यातील वाद रात्री होळीभोवती पेटणाऱ्या होमात नष्ट करून पुन्हा नव्या मैत्रीचे, नव्या नात्याचे बंध निर्माण होत आहेत. वाईट गोष्टी दूर करत नव्याचे, मंगलाचे स्वागत करण्यासाठी सगळेच सज्ज झाले आहेत.

जशी होळी गावात आली आहे, तसतशा ग्रामदेवातांच्या पालख्या गाव प्रदक्षिणेसाठी मंदिराबाहेर पडल्या आहेत. देवाला रूपं लागली आहेत. वर्षभर देवाला देवळात भेटणारा भक्त त्याच्या स्वतःच्या घरी देवाचं स्वागत करणार आहेत. जी देवता गावाचं आणि गावकऱ्याचं रक्षण करते तीच देवता आता गावात, वाडीवस्तीत सगळं ठीक आहे ना? हे प्रत्यक्ष बघायला पालखीतून बाहेर पडतं आहेत. यानिमित्ताने वेगवेगळ्या देवांच्या पालख्यांची भेट होऊन गावागावातील ऋणानुबंध घट्ट होतं आहेत.
आपल्या घरात पालखीतून देव येणार म्हटल्यावर फक्त मुंबई, पुण्यातूनच नव्हे, तर जिथे कुठे चाकरमानी असेल तिथून तो रेल्वे, बस, खासगी वाहने करून गावी परतत आहेत. भाद्रपदातील गणेशोत्सवनंतर शांत झालेली गावे, बंद झालेली गावातील घरे पुन्हा गजबजू लागली आहेत. घराघरांची साफसफाई होऊन रांगोळी, रंगाने घर सजवली जात आहेत. गोडाच्या सणाला पुरणपोळी आणि तिखट सणाला मांसाहाराचे बेत घराघरात रंगू लागले आहेत.

जेवणात परसातल्या आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैरीचं लोणचं, कुठे पिकलेला आंबाच्या फोडी, फणसाच्या कुयरीची चविष्ट भाजी, फणसाचे गरे कापे खायचे की बरके यावर चर्चा झडू लागल्या आहेत. गावातल्या घरात अनेक महिने एकटीने काढणाऱ्या आज्जी-आजोबांना मुलं-मुली, नातवंड सणासाठी घरी आल्याने जोर आला आहे. त्यांचे दुखणारे गुडघे, वळणारे पाय, अंधुक झालेली दृष्टी… हे सगळे आजार आता गायब झाले आहेत.

ही कला काळाच्या उदरात गडप झाली, असं म्हणणाऱ्यांना खोटं ठरवत गोमू, नाखवा गावागावांत बाहेर पडले आहेत. पुठ्ठ्यातून तयार झालेल्या छोट्यांच्या पालख्या सजल्या आहेत. वार्षिक परीक्षा तोंडावर असल्या, गावात कुणाच्या दहावीच्या, बारावीच्या परीक्षा सुरू असल्या तरीही शिमग्याच्या उत्सवात दंगून जाण्यासाठी सगळेच सज्ज झाले आहेत.

अनेक ठिकाणी फाल्गुन पौर्णिमा आणि धूलिवंदनापर्यंत होळी उत्सव साजरा केला जात असला तरी कोकणात मात्र खरे रंग खेळले जातात ते रंगपंचमीला! तोपर्यंत आणि काही गावांमध्ये त्यानंतरही शिमगोत्सव सुरूच असतो. पालख्यांसोबत होळीच्या होमाभोवती ढोल-ताशे यांचा गजर होत असल्याने परिसरातील वातावरणात अचानक वेगळा रंग दिसू लागला आहे. हे बदलते वातावरण केवळ कोकणातील शिमगोत्सवामुळे झाले आहे.

कडक ऊन, त्यामुळे येणारं पाण्याचं दुर्भीक्ष, बदलत्या हवामानात अडकलेला आंबा, काजू, मासेमारी, मुसळधार पावसामुळे विस्कळीत होणारे आयुष्य, रोजगाराचा अभाव, अनेक आवश्यक सुविधांअभावी विकासाच्या व्याख्येत अद्यापही न बसणाऱ्या या कोकणात आजही अनेक अडचणी, अनेक समस्या आहेतच. जीवनमान सुसह्य, सुखकारक करण्यासाठी आजही इथे संघर्ष करावा लागतो आहे.
तरीही त्या सगळ्या वेदना, कष्ट, घोर, चिंता, ताण हे सगळं होळीच्या होमात भिरकावून घरी येणाऱ्या

ग्रामदेवतेच्या पालखीच स्वागत करत त्याच्या मिरवणुकीत आनंदाने सहभागी होऊ शकतो, तो पक्का कोकणीच. त्याच्या अनंत अडचणी, समस्यावर उपाय मिळेल की नाही, याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. पण होळीच्या होमात, गुलालच्या रंगातून तो नवी ऊर्जा मिळवतो, लढण्याचं बळ मिळवतो आणि येणाऱ्या नव्या हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज होतो.

हीच ऊर्मी कोकणात शिमगोत्सवामुळे मिळतं असते. म्हणूनच जस बाप्पाच्या आशीर्वादासाठी इथला गणेशोत्सव महत्त्वाचा तसंच नवऊर्मी, नवउत्साह आणि लढण्याच्या नव्या ऊर्जेसाठी शिमगा उत्सवसुद्धा महत्त्वाचा आहे, हे कोकणी माणूस जाणतोच. म्हणूनच गाव-गाव गजबजले आहे, उत्साह प्रत्येक ठिकाणी ओसंडून वाहत आहे. शिमग्याला कोकणात सुरुवात झाली आहे आणि फाकांनी आसमंत दुमदुमत आहे.

हुरा रे हुरा नि आमच्या ग्रामदेवतेच्या पालखीला सोन्याचा तुरा रे… होलिओ…!
करवत रे करवत नि आमचा देव आला मिरवत रे… होलिओ…!!

Recent Posts

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

2 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

2 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

5 hours ago

अवयवदान प्रबोधनाची चळवळ

कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…

6 hours ago

आरोग्य विम्यासाठी वयाची अट काढली, पण…

अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत मागच्या महिन्यात एक महत्त्वाची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली, ती म्हणजे…

6 hours ago

पहिल्या चार टप्प्यातच झालाय महाविकास आघाडीचा सुपडा साफ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा मुंबई : महाराष्ट्रात चार चरणांच्या निवडणूक पूर्ण झाल्या आहेत. २०…

9 hours ago