Tuesday, July 21, 2026

Nashik : सप्तशृंगगड घाटात अपघाताची भीती; रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी

Nashik : सप्तशृंगगड घाटात अपघाताची भीती; रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी

Nashik : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी देवस्थान (Saptashrungi Temple) परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि दाट धुके पडत असल्याने नांदुरी ते सप्तशृंग गड या १० किलोमीटरच्या घाटरस्त्यावर वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे घाटातील रस्त्यावर तातडीने रिफ्लेक्टर व दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी भाविक व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

नागमोडी वळणांमुळे अपघाताचा धोका

घाटरस्त्यावर सध्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून, यापूर्वी बसविण्यात आलेले अनेक रिफ्लेक्टर काढले गेले किंवा रस्त्याखाली दाबले गेले आहेत. दाट धुक्यामुळे समोरील रस्ता दिसत नसल्याने वाहने रस्त्याच्या कडेला चिखलात अडकत आहेत. नागमोडी वळणांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, विशेषतः रात्री वाहनचालकांना लाईटच्या सहाय्याने मार्ग शोधत प्रवास करावा लागत आहे.

घाटातील धोकादायक वळणांवर रिफ्लेक्टर व दिशादर्शक फलक नसल्याने, विशेषतः रात्री आणि दाट धुक्यात, नवीन भाविकांची दिशाभूल होते. पावसाळ्यात संभाव्य अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटरस्त्याच्या दोन्ही बाजूंना रिफ्लेक्टर तसेच आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक तातडीने बसवावेत, अशी मागणी भाविक, ग्रामस्थ व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

...तर आंदोलन छेडणार

सप्तशृंग गडावर सध्या दाट धुके असल्यामुळे घाटातून वाहन चालविताना चालकांना, विशेषतः रात्री, रस्ता दिसत नाही. त्यामुळे वाहनचालकांची मोठी तारांबळ उडते. अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित घाटरस्त्याच्या दोन्ही बाजूंना रिफ्लेक्टर बसवावेत. अन्यथा आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही.

संदीप भाऊ बेनके, उपसरपंच, सप्तशृंग गड

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >