Tuesday, July 7, 2026

नाशिक प्रशासन अलर्ट! जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा इगतपुरी दौरा; धरणे, पूल आणि धबधब्यांची पाहणी

नाशिक प्रशासन अलर्ट! जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा इगतपुरी दौरा; धरणे, पूल आणि धबधब्यांची पाहणी

नाशिक : भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी आणि नाशिक ग्रामीण भागासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. मंगळवारी सकाळपासून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी स्वतः इगतपुरी तालुक्यात जाऊन पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केली. त्याचवेळी सहायक जिल्हाधिकारी तथा नाशिकच्या उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे (Arpita Thube) यांनी गंगापूर व कश्यपी धरणासह सोमेश्वर धबधबा परिसरात सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले.

नाशिकमध्ये संततधार सुरूच

नाशिकमध्ये ढगफुटीसदृश पावसाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र आता हे ढग अहिल्यानगर तसेच गुजरातच्या दिशेने वळल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला असला संततधार सुरु आहे. संभाव्य धोखा लक्षात घेता प्रशासन अलर्ट मोड्वर आहे. नैसर्गिक संकट तूर्तास टळले असले, तरी नाशिक जिल्ह्यात संततधार कायम आहे. त्यामुळे गोदावरीसह विविध नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

इगतपुरीत जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी इगतपुरी व त्र्यंबकेश्वर (Igatpuri and Trimbakeshwar) तालुक्यातील पावसाच्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. सततच्या पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून त्र्यंबकेश्वर–खोडाळा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच इगतपुरीतील जुन्या कसारा महामार्गावर काही ठिकाणी माती आल्याने वाहनचालकांना अत्यंत सावधगिरीने प्रवास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नांदगाव सदो ते भावली दरम्यान दारणा नदीवरील पुलाची पाहणी केली. नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने पुलावरून पाणी वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. संभाव्य धोका लक्षात घेऊन पुलावर कायमस्वरूपी बंदोबस्त ठेवण्याचे तसेच परिस्थिती गंभीर झाल्यास पूल तातडीने वाहतुकीसाठी बंद करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या पाहणी दौऱ्यात इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. जी. व्ही. एस. पवनदत्ता (Dr. G. V. S. Pavandatta) , तहसीलदार अभिजित बारावकर (Abhijit Baravkar) यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाकडून तालुक्यातील पावसाची सद्यस्थिती, संभाव्य धोके आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सविस्तर माहिती घेतली.

पोलीस बंदोबस्त तैनात

दुसरीकडे, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे यांनी गंगापूर धरण, कश्यपी धरण, सोमेश्वर धबधबा, जलालपूर आणि महादेवपूर घाट परिसराची पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. पावसाळ्यात धरणे, घाट आणि धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच तलाठी, मंडळ अधिकारी आणि महसूल यंत्रणेला सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सूचनांचे पालन करा, सुरक्षेला प्राधान्य द्या

अर्पिता ठुबे यांनी नागरिकांना आणि पर्यटकांना धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले. नदीपात्र, धबधबे आणि घाट परिसरात सेल्फी किंवा पाण्यात उतरण्याचा मोह टाळावा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्ह्यात पुढील काही तास संततधार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >