Thursday, May 21, 2026

USA Invest In India : भारतात अणुऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणार अमेरिका

USA Invest In India : भारतात अणुऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणार अमेरिका

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेतील अणुऊर्जा क्षेत्रातील सहकार्यामध्ये आगामी काळात "मोठ्या घडामोडी" घडणार असल्याचे संकेत भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मोठी गती मिळण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात भारत आणि अमेरिकेमध्ये अणुऊर्जा क्षेत्रात मोठे करार होणार असून, त्याचा मोठा फायदा महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी स्वतः याबद्दल माहिती देत, "अणुऊर्जा क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये खूप मोठे काम होणार आहे," असा विश्वास व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सेंटर्सचा वेगवान विस्तार होत असल्यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढणार आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आणि राज्याला चोवीस तास अखंड वीज पुरवण्यासाठी अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'युएस न्यूक्लियर एक्झिक्युटिव्ह मिशन टू इंडिया' अंतर्गत 'न्यूक्लियर एनर्जी इन्स्टिट्यूट' आणि 'युएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम'च्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टला उत्तर देताना राजदूत गोर यांनी, "भारत-अमेरिका अणूर्जा सहकार्यात भविष्यात मोठी गती मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.

जागतिक पातळीवर ऊर्जेच्या क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. या बदलांमध्ये महाराष्ट्र कुठे उभा आहे आणि राज्याला अणुऊर्जेची गरज का आहे, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षांपासून सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. परंतु, सूर्यप्रकाश किंवा वारा चोवीस तास उपलब्ध नसतो. त्यामुळे मोठ्या उद्योगांना विनाअडथळा आणि प्रदूषणमुक्त वीज पुरवण्यासाठी 'अणुऊर्जा' हाच भविष्यातील सर्वात मोठा आणि पायाभूत आधार ठरणार आहे. सध्या संपूर्ण देशात येणाऱ्या परदेशी गुंतवणुकीपैकी ४० टक्क्यांहून अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येते. एवढेच नाही, तर देशातील एकूण डेटा सेंटर्सपैकी तब्बल ६० टक्के क्षमता एकट्या मुंबई आणि नवी मुंबई परिसरात आहे. त्यामुळे राज्याला अवाढव्य प्रमाणावर विजेची गरज आहे. राज्यात आता सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, लॉजिस्टिक्स आणि प्रगत कारखानदारी यांसारखे अत्याधुनिक उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहेत. या नवीन उद्योगांमुळे येत्या काही वर्षांत विजेची मागणी कैक पटीने वाढणार आहे. महाराष्ट्र हा देशाचा सर्वात मोठा औद्योगिक कणा असणार आहे. त्यामुळे भविष्यातील औद्योगिक अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी अणूर्जा अत्यंत महत्त्वाची ठरेल. हेच लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी अमेरिकन कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

अमेरिकेच्या २५० व्या स्वातंत्र्यदिनाचे निमंत्रण

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून भारतासोबतचे संबंध अधिक घट्ट करण्याचे संकेत दिले. अमेरिका आपल्या स्वातंत्र्याचा २५० वा वाढदिवस साजरा करत असून, हा आनंद जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतासोबत साजरा करायला अमेरिकेला आवडेल, असे त्यांनी म्हटले आहे. यावरून आगामी काळात दोन्ही देशांमधील व्यावसायिक आणि धोरणात्मक संबंध अधिक मजबूत होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >