पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर (Pune Junner) तालुक्यात बिबट्या आणि मानवी वस्तीतील संघर्ष काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. ओतूर (Otur Area) परिसरातील वाकचौरे मळा येथे पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याची एक भयंकर घटना समोर आली आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास एका १० वर्षीय लहान मुलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या घटनेमुळे संपूर्ण ओतूर आणि जुन्नर परिसरात पुन्हा एकदा प्रचंड घबराट आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. काव्या महेंद्र वाकचौरे असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीचे नाव आहे.
उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट सुरू असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील १७ राज्यांसाठी मोठा हवामान इशारा जारी केला आहे. पुढील १५ ते १६ तासांत ...
नेमका कसा घडला प्रसंग?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२१ मे) पहाटे सहा वाजेच्या सुमारास काव्या आपल्या बहिणीसोबत घराच्या आजूबाजूलाच मॉर्निंग वॉक करत होती. परिसरातील शांततेचा फायदा घेत एका झुडपात बिबट्या आधीच दबा धरून बसला होता. काव्या जवळ येताच क्षणाचाही विलंब न लावता बिबट्याने तिच्यावर थेट झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरलेल्या काव्याने आणि तिच्या बहिणीने जोरजोरात मदतीसाठी टाहो फोडला. मुलींचा आरडाओरडा ऐकताच आजूबाजूचे नागरिक आणि कुटुंबीय तातडीने घटनास्थळी धावून आले. लोकांची गर्दी आणि गोंधळ पाहून बिबट्याने तिथून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. मात्र, या जीवघेण्या हल्ल्यात काव्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
१४ कोटींचे रुग्णालय धूळखात
या भीषण घटनेनंतर एक अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी बाब समोर आली. जखमी काव्याला तातडीने उपचारासाठी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, ओतूरमध्ये तब्बल १४ कोटी रुपये खर्चून एक सुसज्ज ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आलेले असतानाही, ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. तिथे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नेमणूकच न झाल्याने, या गंभीर जखमी मुलीला वेळेवर योग्य उपचार मिळण्यात मोठ्या अडचणी आल्या. शासनाच्या या निष्काळजीपणामुळे आणि उपचारांअभावी झालेल्या हेळसांडीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची आक्रमक मागणी
घटनेचे गांभीर्य ओळखून मुलीचे पालक आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक सखाराम अहिनवे यांनी तत्काळ वनविभागाला या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर वनाधिकारी घटनास्थळी हजर झाले. वाकचौरे मळा आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर लक्षणीयरीत्या वाढला असून शेतकरी आणि नागरिकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने आता बघ्याची भूमिका न घेता लवकरात लवकर या भागात पिंजरा लावावा. तसेच, बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आता संतप्त ग्रामस्थांकडून केली जात आहे.






