कोणत्याही क्षेत्रातल्या कुणा व्यक्तीची जन्मशताब्दी असली की त्या व्यक्तीने त्या क्षेत्रात जे योगदान दिले आहे, त्यासंबंधी आठवणींना उजाळा दिला जातो. असेच एक उदाहरण आता मराठी रंगभूमीवर कायम झाले आहे आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे माध्यमांतर...! प्रख्यात लेखिका महाश्वेतादेवी यांची यंदा जन्मशताब्दी आहे आणि हे औचित्य साधून त्यांच्या तीन कथांवर आधारित 'महोगाथा' हे नाटक मराठी रंगभूमीवर आले आहे. यानिमित्ताने, साहित्य ते नाट्यकृती असा हा माध्यमांतराचा प्रवास झालेला दिसून येत असून, या नाटकाच्या माध्यमातून संबंधित नाटकमंडळींनी महाश्वेतादेवी यांच्या लेखणीला सलाम केला आहे.
या नाटकाचे रंगभूमीवर प्रयोग होत आहेत; इतकेच त्याचे महत्त्व नाही, तर या नाटकाबद्दल वैचारिक चर्चा सध्या नाट्यसृष्टीत सुरू आहे. कारण नेहमीच्या चाकोरीबद्ध पठडीत न बसणारे हे नाटक आहे. मुळात महाश्वेतादेवी यांच्या कथा निवडून त्यावर नाट्यसंहिता लिहायची आणि ती आत्मविश्वासाने रंगभूमीवर सादर करायची; असे महत्त्वाचे कार्य या नाटकमंडळींनी केले आहे. बंगाली भाषेतल्या कथांचे माध्यमांतर, मराठी रंगभूमीवर या नाटकाच्या निमित्ताने झालेले दिसून येत आहे. साहजिकच, या नाटकाच्या माध्यमातून दोन भाषांचे आदानप्रदानही घडून आले आहे. कलेला भाषा नसते याचे उत्तम उदाहरण 'महोगाथा' नाटकाने कायम केले आहे.
प्रयोगशीलतेची कास धरलेल्या या नाटकात आघाडीचे कलावंत नसतानाही, आशयानुरूप हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर लक्ष वेधून घेत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, म्हणजेच १४ एप्रिल रोजी संध्याकाळी या नाटकाचा प्रयोग प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. सावित्री मेधातूल यांनी हे नाटक लिहिले असून, मंगेश सातपुते यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.
हृदयनाथ जाधव, विक्रम होता, मुक्ती साधना आणि सावित्री मेधातूल हे कलाकार या नाटकात भूमिका साकारत आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून महाश्वेतादेवी यांच्या कार्याला मानवंदना देण्यास ते आता सज्ज झाले आहेत.






