मुरुड : मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी येत असते. अचानक हवामानात बदल झाल्यामुळे शिडाच्या बोटी बंद करण्याचा निर्णय बंदर खात्याने घेतला. त्यामुळे जंजिरा किल्ला नऊ दिवस बंद होता. यामुळे आलेल्या लाखो पर्यटकांना किल्ल्या पाहण्यास न मिळाल्याने हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले. अखेर तब्बल नऊ दिवसांनी पर्यटकांना जंजिरा किल्ला पाहण्यासाठी खुला झाला आहे, असे पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील राजपुरी येथे असलेला जगप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दिवाळी सुट्टीतील वीकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. परंतु हवामान खात्याने दिलेल्या इशारतानुसार, अचानक हवामानात बदल घडून आले व समुद्रातील हवेने वेग धरला. त्यामुळे शिडाच्या बोटी समुद्रात चालवणे अवघड होऊ लागले. पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू नये म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी बंदर विभागाने बोटी बंद करण्याचा निर्णय घेतला.
मुंबई, ठाणेसह राज्यातला अनेक जिल्ह्यातून व महाराष्ट्राबाहेरून सुद्धा पर्यटक मोठ्या प्रमाणात आलेले दिसून येत होते. या आलेल्या पर्यटकांच्या आनंदावर हवामानाने अचानक विरजन टाकले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची हिरमोड झाल्याचे दिसून आले. दिनांक ०३ नोव्हेंबर रोजी बोटी सुरु करण्यात आल्याने तब्बल नऊ दिवसांनी पर्यटकांना किल्ला पाहण्यासाठी सुरू केला आहे.
या किल्ल्याच्या मागील बाजूस ब्रेक वॉटर बंधारा टाकून त्या ठिकाणी जेट्टी उभारण्यात आलेले आहे. ती लवकरात लवकर सुरू करावी जेणेकरून पर्यटकांना सुरक्षित किल्ला पाहता येईल, अशी मागणी पर्यटकांमधून व स्थानिकांमधून जोर धरत आहे.






