
मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ घेतली. राज्याचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांनी त्यांना शपथ दिली. आचार्य देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून राज्यपालपदाची शपथ घेतली. आता आचार्य देवव्रत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्यरत असतील. देवव्रत यांनी ऑगस्ट २०१५ ते जुलै २०१९ पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपालपद भूषवले होते. त्यांनी जुलै २०१९ पासून गुजरातचे राज्यपाल म्हणून काम सुरू केले. आजपासून ते महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांचे राज्यपाल झाले आहेत. राज्यपालांना शपथ घेतल्यानंतर मानवंदना देण्यात आली.
View this post on Instagram
आचार्य देवव्रत यांनी इतिहास आणि हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. योग विज्ञानात डिप्लोमा केला आहे. निसर्गोपचार आणि योगिक विज्ञानात ते डॉक्टर आहेत. वैदिक मानवी मूल्ये आणि वैदिक तत्वज्ञानावर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. नैसर्गिक शेती आणि गोवंश सुधारणेबद्दल जागरूकता पसरविण्यासाठी त्यांनी भरपूर काम केले आहे. ते एक अनुभवी शिक्षणतज्ज्ञ आणि राजकीय संतुलन जपणारे हुशार राजकारणी आहेत. हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये राज्यपाल म्हणून काम करतेवेळी त्यांनी प्रशासकीय काम वेगवान आणि पारदर्शक व्हावे यासाठी सरकारशी समन्वय साधून प्रभावी प्रयत्न केले. तसेच विद्यापीठांचे कुलपती म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रातील सुधारणांना चालना देण्याचे काम केले. यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांच्याकडून अनेकांच्या अनेक अपेक्षा आहेत.
रेल्वेने मुंबईत आले राज्यपाल
शपथविधीसाठी आचार्य देवव्रत रविवारी रेल्वेने मुंबईत आले. आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही देवव्रत यांचे स्वागत केले. कौशल्य विकास मंत्री आणि मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त मुख्य सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, रेल्वे पोलीस महासंचालक प्रशांत बुरुडे, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, मुंबई शहर जिल्हाधिकारी आँचल गोयल तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे रेल्वे पोलीस विभागाच्यावतीने महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांना मानवंदना देण्यात आली.