
ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर
सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी एक असलेल्या पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता वाघांची डरकाळी घुमणार आहे. वाघांच्या स्थलांतर प्रस्तावात तीन वेळा निघालेल्या त्रुटी दूर करून चांगल्या श्रेणीमध्ये स्थान मिळवल्यानंतर ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून तीन नर आणि पाच मादी, अशा आठ वाघांना जेरबंद करून सह्याद्रीमध्ये सोडण्यास केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे. २०१८ च्या मूल्यांकनात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ३७ व्या क्रमांकावर होता. मात्र, मागील तीन वर्षांत क्षेत्रीय व्यवस्थापनात केलेल्या परिणामकारक बदलामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने चांगल्या श्रेणीमध्ये स्थान मिळवत ५१ व्याघ्र प्रकल्पांमध्ये ३७ व्या स्थानावरून २७ व्या स्थानावर झेप घेतली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना २०१० मध्ये झाल्यापासून २०१०, २०१४, २०१८मध्ये झालेल्या मूल्यांकनात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने “फेअर आणि गुड” अशा श्रेण्या मिळवल्या होत्या.
व्याघ्रगणनेच्या २०२२ च्या अहवालात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सध्या एकही वाघ नाही, असे नमूद होते. त्यामुळे राज्याच्या वन खात्याने पहिल्या टप्प्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याची योजना आखली. हा प्रस्ताव राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे गेला आणि दीड वर्षांपूर्वी परवानगी मिळाली. मात्र, प्रस्तावात तीनवेळा त्रुटी निघाल्या. त्या दूर करून पुन्हा हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला.
...तर परवानगी रद्द होणार
वाघांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी किंवा धोक्यात आणणारी कोणतीही चूक घडल्यास केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने दिलेल्या परवानगीचा आढावा घेण्यात येईल किंवा ती रद्द करण्यात येईल, असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सध्या तीन वाघांचा अधिवास आहे. ही संख्या वाढण्यासाठी ताडोबा आणि पेंच प्रकल्पातील आठ वाघ सह्याद्रीमध्ये सोडण्यास परवानगी मिळाली आहे; परंतु आम्ही आधी दोन मादी वाघांना सह्याद्रीमध्ये आणणार आहोत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य वाघांना आणले जाणार आहे.