
सोलापूर : लवकरच परतीचा पाऊस सुरू होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पण राज्यातील काही भागांमध्ये पाऊस धुमाकूळ घालत आहे. सोलापूर जिल्ह्यात २४ तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. अनेक घरांमध्ये गटाराचे पाणी घुसले आहे. रात्रभर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यात वाताहात झाली आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्याला २४ तासांसाठी रेड अलर्ट दिला होता. जिल्ह्यात २४ तासांत ११८.३ मिमी पावसाची नोंद झाली. सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द, सांगवी बुद्रुक, चपाळगाव, चुंगी या गावांमध्ये रात्रभर मुसळधार पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले. अक्कलकोट तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्पातून चार हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. बोरी नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. नदी किनारी कोणीही जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील रस्ते वाहतूक पुरती मंदावली. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नगरिकांच्या संपत्तीचे नुकसान झाले. अनेक घरांमध्ये दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी शिरले. नागरिकांची तारांबळ उडाली.