मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या माजी नगरसेविका स्नेहल जाधव आणि माजी नगरसेवक सुधीर जाधव यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे ईशान्य मुंबईत शिवसेनेची ताकद अधिक वाढली असल्याचे मानले जात आहे.
https://prahaar.in/2025/12/30/ajit-pawar-announced-the-second-list-of-candidates-on-the-last-day-of-filing-applications/
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘नंदनवन’ येथे हा सोहळा पार पडला. यावेळी सुधीर जाधव आणि स्नेहल जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत भगवा हाती धरला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांना भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. मनसेचे अनेक पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. स्नेहल जाधव यांनी यापूर्वी नगरसेविका म्हणून केलेल्या कामाचा अनुभव आणि सुधीर जाधव यांची जनसंपर्क कौशल्याचा फायदा आता शिवसेनेला मुंबईत, विशेषतः त्यांच्या बालेकिल्ल्यात होणार आहे.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “तळागाळातील जनतेसाठी काम करणारे नेतृत्व शिवसेनेत येत आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला निश्चितच फायदा होईल,” असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच भावी राजकीय वाटचालीसाठी त्यांनी जाधव दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
स्नेहल जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले की, शिवसेनेची सर्वसामान्य जनतेशी असलेली बांधिलकी, विकासाभिमुख धोरणे आणि नेतृत्वावर असलेला विश्वास यामुळेच आपण शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. “जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी शिवसेनेत मिळेल,” असे त्या म्हणाल्या. सुधीर जाधव यांनीही पक्ष संघटनेत सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
जाधव प्रवेशानंतर बोलताना जाधव दाम्पत्याने सांगितले की, “मुंबईतील रखडलेले प्रकल्प आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्या गतीने काम करत आहेत, त्या विकासकामांना साथ देण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे.” या पक्षप्रवेशामुळे मनसेला मुंबईत गळती लागली असून, आगामी निवडणुकीत याचे काय परिणाम होतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.