सगळीकडे भगवाधारी महापौर दिसणार : मंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग : निवडणुकीच्या निकालांनंतर राजकीय वातावरण तापले असून, भाजप आमदार आणि पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. “आम्ही महाविकास आघाडीला आता औषधासाठीही शिल्लक ठेवले नाही,” अशा शब्दांत त्यांनी उबाठा गट, शरद पवार गट आणि काँग्रेसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सगळीकडे फक्त शिवसेना आणि भाजपच दिसत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
https://prahaar.in/2025/12/20/pm-viksit-bharat-rozgar-yojana-government-has-allocated-99446-crore-for-job-creation/
येणाऱ्या महापालिका निवडणुकांबाबत भाष्य करताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, “आगामी काळात सर्व महापालिकांवर हिंदुत्व विचारांचाच महापौर विराजमान झालेला दिसेल. संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे महापालिका आहेत, तिथे भगवाधारी महापौर पाहायला मिळतील. महायुती सर्वत्र आपले वर्चस्व निर्माण करेल, यात शंका नाही.” त्यांच्या या विधानामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमनेसामने असल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही प्रगल्भ लोक आहोत. प्रदेश पातळीवर झालेल्या निर्णयानुसार आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढलो आहोत. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सदैव एकत्र आहोत. निवडणुकीच्या वेळी निवडणूक असते, पण उद्या आम्ही विजयाचा गुलाल एकत्रच उधळू.”
कणकवलीमध्ये सर्व विरोधक नितेश राणेंच्या विरोधात एकत्र आल्याच्या चर्चेवर त्यांनी सडेतोड उत्तर दिले. “कणकवलीची जनता नेहमीच राणे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि उद्या जनता आम्हालाच आशीर्वाद देईल, याची मला पूर्ण खात्री आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.