कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल त्यांच्या पक्षात आणि त्यांच्या कुटुंबामध्ये संशय वाढत चालला आहे. अफगाणिस्तानच्या दाव्यानंतर, इम्रान खान यांच्या कथित हत्या प्रकरणामुळे राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता टीव्ही चॅनेल किंवा इंटरनेटवर इम्रान खान यांच्याबद्दल कोणतीही चर्चा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांचे दोन्ही पुत्र त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल वारंवार चिंता व्यक्त करत आहेत. तर पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते इम्रान खान यांच्या समर्थनार्थ रावळपिंडी मध्यवर्ती तुरुंगाबाहेर रात्रभर धरणे देत आहेत. तणाव इतका वाढला आहे की पाकिस्तानच्या दोन मोठ्या शहरांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर इस्लामाबाद जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिसूचनेत इस्लामाबाद राजधानी प्रदेशात दोन महिन्यांसाठी कलम १४४ लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर रावळपिंडी उपायुक्तांच्या दुसऱ्या अधिसूचनेत सोमवारी कलम १४४ लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे रावळपिंडीमध्ये ३ डिसेंबरपर्यंत निर्बंध लागू करण्यात येत आहेत. “रेड झोनसह इस्लामाबादच्या महसूल हद्दीतील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींनी एकत्र येत मेळावे, मिरवणुका आणि निदर्शने करण्यास मनाई आहे. सार्वजनिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी धोका निर्माण करणाऱ्या अशा बेकायदेशीर कारवायांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे”, असे इस्लामाबाद प्रशासनाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
https://prahaar.in/2025/12/02/election-update-first-phase-of-voting-begins-in-the-state-but-when-will-the-results-be-out/
लंडनमध्ये राहणारे इम्रानचे सुपुत्र कासिम खान यांनी याबाबत एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की, आम्ही आमच्या वडिलांना शेवटचे नोव्हेंबर २०२२ मध्ये पाहिले होते. कुटुंब म्हणून आम्ही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांकडूनही मदत मागत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना भेटण्याची सुविधा तात्काळ सुरू करावी. डॉक्टरांना आरोग्य तपासणी करण्याची परवानगी द्यावी आणि इम्रान खानच्या प्रकृतीबद्दल अधिकृत अपडेट द्यावे.” तसेच गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्या ठावठिकाणाची पुष्टी करणारा कोणताही पुरावा कुटुंबाला मिळालेला नसल्याने त्यांच्याबद्दल कोणतीच माहिती समोर आली नाही. त्यामुळे माहित न देणे हा एक प्रकारचा मानसिक छळ आहे, असा दावा त्यांनी केला आहे. कासिम यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने आठवड्यात एकदा भेट घेण्याचे आदेश दिले होते, परंतु तुरुंग प्रशासनाने सातत्याने टाळाटाळ केली आहे.
कलम १४४ काय आहे?
कलम १४४ लागू करणे म्हणजे कर्फ्यू लादणे. पाकिस्तानच्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ ही एक कायदेशीर तरतूद आहे जी जिल्हा प्रशासनांना मर्यादित कालावधीसाठी एखाद्या भागात चार किंवा त्याहून अधिक लोकांच्या मेळाव्यावर बंदी घालण्याचा अधिकार देते. कर्फ्यू लादून, शाहबाज सरकार इम्रान खानच्या समर्थकांना एकत्र येण्यापासून रोखण्याचे उद्दिष्ट ठेवते.