मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या चेंबूर अमर महल ते ट्रॉम्बे जलशयापर्यंतच्या जलबोगदा अर्थात टनेलचे काम आता अंतिम टप्प्यात आले. येत्या नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हे टनेल कार्यान्वित होणार आहे. या टनेलमधून पाणी पुरवठा सुरु केला जाणार असल्याने महापालिकेच्या एम पूर्व आणि एम पश्चिम अर्थात गोवंडी, मानखुर्द, देवनार, चेंबूर आदी भागांमधील पाणी पुरवठ्यात येत्या डिसेंबरपासून सुरळीत होणार आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांना आता धो धो पाणी मिळणार आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने अमर महल (चेंबूर) ते ट्रॉम्बे जलाशयापर्यंत जलबोगद्यांचे बांधकाम (५.५० कि.मी.) बोगदा खोदाई यंत्राद्वारे अमर महल (चेंबूर) ते ट्रॉम्बे उच्चस्तर जलाशय पर्यंत एकूण ५.५० कि.मी. लांबीचा जलबोगदा खोदाई तसेच आरसीसी अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या हाती घेण्यात आलेल्या भूस्तरावरील जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु होते आणि हे काम सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु हे काम वेळेत पूर्ण झाले नसले तरी येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत ही सर्व कामे पूर्ण होवून जलबोगद्यातून पाणी पुरवठा सुरु केला जाणार आहे.
https://prahaar.in/2025/11/07/bjp-invites-abu-azmi-for-vande-mataram-program/
या जलबोगद्यातून कार्यान्वित झाल्यानंतर “एम/पूर्व” व “एम/पश्चिम” विभागाच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा होईल, असा विश्वास महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या टनेल संदर्भातील कामांवर शेवटचा हात फिरवला जात आहे आणि या महिना अखेर या टनेलमधून सुरळीत पाण्याचा पुरवठा केला जाईल. या टनेलद्वारे पाणी पुरवठा झाल्यास या मानखुर्द, गाेवंडी, देवनार, शिवाजी नगर, चेंबूर आदी विभागांमध्ये योग्य दाबाने पाणी पुरवठा करणे शक्य होईल. त्यामुळे या परिसराला आता मुलबक पाण्याचा पुरवठा होईल असा विश्वास जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अमर महल हेडगेवार उद्यान ते प्रतिक्षानगर,वडाळा आणि पुढे परेल सदाकांत ढवण उद्यान पर्यंत ९.७ कि.मी. लांबीचा जलबोगदा खोदाईचे काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्यात अमर महल ते वडाळा दरम्यानच्या आतील बाजुस आरसीसी अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यात वडाळा ते परेल पर्यंतचे काम सुरु आहे. हे काम माहे एप्रिल २०२६ पर्यंत पूर्णत्वास येणे अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हा जलबोगदा सुरु झाल्यानंतर वडाळा, शीव(एफ/उत्तर), परेल, शिवडी (एफ/दक्षिण विभाग) भायखळा, नागपाडा (ई विभाग) आणि कुर्ला (एल) विभागातील काही भागाच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा होईल,असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.