Home ताज्या घडामोडी ‘मनाचे श्लोक’ नाही! आता ‘तू बोल ना’ म्हणायचे, दिग्दर्शक मृण्मयीने जाहीर केले नवे नाव

‘मनाचे श्लोक’ नाही! आता ‘तू बोल ना’ म्हणायचे, दिग्दर्शक मृण्मयीने जाहीर केले नवे नाव

‘मनाचे श्लोक’ नाही! आता ‘तू बोल ना’ म्हणायचे, दिग्दर्शक मृण्मयीने जाहीर केले नवे नाव

मुंबई: अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे दिग्दर्शक मृण्मयी देशपांडेने नव्या नावासोबत १६ ऑक्टोबरला चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत मृण्मयीने तिच्या अधिकृत सोशल मिडिया खात्यावरून माहिती दिली होती. त्यामुळे ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाचे नाव बदलून ‘तू बोल ना’ असे नाव देण्यात आले आहे. या नव्या नावाची घोषणा मृण्मयीने इंस्टाग्राम रीलद्वारे दिली आहे. त्यामुळे ‘मनाचे श्लोक’ हा चित्रपट ‘तू बोल ना’ या नव्या नावाने गुरुवारी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

मनाचे श्लोक हा चित्रपट पहिल्यांदा १० ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता. सेन्सॉर बोर्ड आणि न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिल्यानंतरही काही संघटनांनी चित्रपटगृहाबाहेर गोंधळ घातला होता. तसेच चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडले होते. याचा त्रास प्रेक्षकांना होऊ नये तसेच चित्रपटगृह आणि सार्वजनिक मालमत्तेचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र १६ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.

https://prahaar.in/2025/10/15/world-famous-music-chanel-mtv-shutting-down-till-december-ending/

‘तू बोल ना’ या चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब अशी तरुणांची तगडी फळी झळकणार आहे. तसेच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर हे ज्येष्ठ कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. दिग्दर्शनासोबतच या चित्रपटाचे लेखन मृण्मयी देशपांडेने केले आहे.