मिझोरम : मिझोरम या राज्याची स्थापना २० फेब्रुवारी १९८७ रोजी झाली. राज्य स्थापनेनंतर जवळपास ३८ वर्षांनी मिझोरम रेल्वेद्वारे जोडण्यात आले. मिझोरममध्ये पहिल्यांदाच रेल्वे सेवा सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदींनी बैरागी ते सैरांग या ५१ किमीपर्यंतच्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले. या रेल्वे सेवेमुळे रेल्वे थेट मिझोरममध्ये राजधानी आयजोलशी जोडली गेली आहे. सैरांग स्टेशन राजधानी आयजोलपासून केवळ १२ किमीवर आहे. यामुळे मिझोरम भारताशी रेल्वे मार्गाने जोडले गेले आहे.

Today is a very special day for Mizoram! pic.twitter.com/zo1uiT4KGv
— Narendra Modi (@narendramodi) September 13, 2025
गुवाहाटी किंवा कोलकातापर्यंत जाण्यासाठी आधी ४ ते ५ तास लागत होते. तेच अंतर आता केवळ दीड तासांत पूर्ण करता येईल. बैरागी ते सैरांग दरम्यानची रेल्वे सेवा ही ५१ किमी. च्या मार्गावर धावणार आहे. सीआरएसने या प्रकल्पासाठी ३० जून २०२५ रोजी मंजुरी दिली होती. या रेल्वेसाठी उभारण्यात आलेला पूल १०४ मीटर उंच आहे. हा पूल कुतुबमीनारपेक्षाही ४२ मीटर अधिक उंचीवर आहे. पुढील १०० वर्ष हा पूल टिकेल असं बांधकाम करण्यात आलं आहे.
मिझोरममधील रेल्वे प्रकल्पासाठी ८,०७० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी बैराबी आणि सैरांग या दोन नव्या रेल्वे मार्गांचे उद्घाटन केले. यामुळे मिझोरमची राजधानी पहिल्यांदाच भारतीय रेल्वे जाळ्याशी जोडली गेली आहे. जिथे पूल आहे ते ठिकाणी दुर्गम अशा डोंगराळ भागात आहे. रेल्वे मार्ग प्रकल्पात ४५ बोगदे आहेत. याशिवाय, त्यात ५५ मोठे पूल आणि ८८ लहान पूल देखील आहेत. रेल्वेमुळे मिझोरमची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे तसेच सैन्याला आवश्यकता भासल्यास रेल्वे मार्गाने लष्करी साहित्य अथवा सैन्य तुकड्या वेगाने पुढे पाठवण्यास मदत होणार आहे. मिझोरममधील पर्यटनाला चालना मिळण्यासही रेल्वेमुळे मदत होणार आहे. मिझोरम या राज्याच्या सीमा म्यानमार आणि बांगलादेश या दोन देशांशी जोडलेल्या आहेत. यामुळे मिझोरममध्ये रेल्वे सेवा सुरू होण्याला देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने विशेष महत्त्व आहे.