लातूर: महाराष्ट्रातील लातूरमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीला आलेली पिकं मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. दरम्यान, अहमदपूर तहसीलमधील एका गावातील ७० वर्षीय शेतकऱ्याने पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे नुकसान पाहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी वेळीच त्याला वाचवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. येथे नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेक हेक्टरवरील पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या भागात, लातूरच्या अहमदपूर तहसीलमधील ब्रह्मवाडी गावातून एक घटना समोर आली आहे. येथे एका वृद्ध शेतकऱ्याने डोळ्यासमोर पीक उद्ध्वस्त होताना पाहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Sad very sad .. Maharashtra’s Latur district in which a farmer insisting to commit suicide due to the destruction of crops in flood. In the viral video, the farmer is spoiling in a field full of water. He is saying, “Everything is washed away, let me die, what should I do by… pic.twitter.com/qgK6OYWyQs
— Waahiid Ali Khan (@waahiidalikhan) August 30, 2025
मोतीराम मारुती घुगे (वय ७० वर्ष) असे संबंधीत शेतकऱ्याचे नाव आहे. मोतीराम घुगे यांच्याकडे फक्त दीड एकर जमीन आहे. या जमिनीवर त्यांचे संपूर्ण कुटुंब जगते. परंतु पाऊस आणि पुरामुळे त्यांचे शेत पूर्णपणे पाण्याखाली गेले आणि उभे पीक नष्ट झाले. नुकसानीचे हे दृश्य पाहून त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ते जवळून वाहणाऱ्या नदीच्या दिशेने धावले, आणि नदीत उडी मारून आयुष्य संपवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र सुदैवाने गावातील काही तरुणांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले.
या घटनेमुळे मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भीषण परिस्थिती समोर आणली आहे. सततचा पाऊस आणि पुरामुळे पिकांचे झालेल्या अतोनात नुकसानीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट अधिकच गडद होत चालले आहे. मोतीराम घुगे यांनी सरकारकडे त्यांच्या शेतातील नुकसानीचा पंचनामा करून योग्य आर्थिक भरपाई देण्याची मागणी केली आहे. लातूरसह आसपासच्या अनेक भागातही अशीच परिस्थिती आहे, जिथे शेतकरी त्यांच्या कष्टाचे पैसे पाण्यात वाहून गेल्याचे पाहून हवालदिल झाले आहेत.