Home ताज्या घडामोडी बेस्टच्या उत्पन्नात वाढ, मात्र प्रवासी संख्येत घट

बेस्टच्या उत्पन्नात वाढ, मात्र प्रवासी संख्येत घट

बेस्टच्या उत्पन्नात वाढ, मात्र प्रवासी संख्येत घट

मुंबई (प्रतिनिधी) : आर्थिक संकटातून सावरण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बेस्ट बसच्या साध्या व वातानुकूलित तिकीट दरात ९ मे पासून वाढ केली. साध्या बसचे तिकीट ५ रुपयांवर ६ रुपये तर वातानुकूलित बसचे तिकीट ६ रुपयांवर १२ रुपये केले. मात्र तिकिट दरात वाढ केल्यानंतर ३० लाख प्रवासी संख्या आता २५ लाखांवर आली आहे. परंतु प्रवासी संख्येत घट झाली असली तरी उत्पन्नात मात्र भरघोस वाढ झाली असून सद्यस्थितीत रोज ३.२५ कोटींचा महसूल बेस्टच्या तिजोरीत जमा होत आहे.

गेल्या १० वर्षांत बेस्ट उपक्रमाला उतरती कळा लागली असून दिवसेंदिवस आर्थिक कोंडी वाढतच गेली. आर्थिक कोंडी फोडण्यासाठी बेस्ट उपक्रमाने मुंबई महापालिकेकडे पैशांची मागणी केली असता २०१६ ते आतापर्यंत ११ हजार कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला मदत केली. तरीही बेस्टची आर्थिक कोंडी वाढतच गेल्याने अखेर बेस्ट उपक्रमाला तिकीट दरात वाढ करण्यास मुंबई महापालिकेने मंजुरी दिली. मुंबई महापालिकेच्या मंजुरीनंतर रिजनल ट्राफिक अँथोरेटीने तिकीट दर वाढीला मंजुरी दिली. अखेर ९ मे पासून तिकीट दरात वाढ झाली.

साध्या बससाठी पहिल्या पाच किमीसाठी ५ रुपये ऐवजी १० रुपये तर वातानुकूलित बससाठी पहिल्या पाच किमी साठी ६ रुपये ऐवजी १२ रुपये अशी तिकीट दर वाढ झाली. तर पुढील टप्प्यासाठी साध्या बसला १५ रुपये, तर वातानुकूलित बसला २० रुपये मोजावे लागत आहेत. तिकीट दर परवडत नसल्याने बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत जरी भर पडत असली तरी प्रवासी संख्येत मात्र घट झाली आहे. ९ मे पूर्वी रोजचे ३० लाख प्रवासी बेस्ट बसने प्रवास करत होते.

६ ऑगस्ट रोजी उपक्रमाची प्रवासी संख्या २५ लाखांवर पोहोचली असून दैनंदिन उत्पन्न हे अडीच कोटींहून आता थेट ३.२५ कोटी इतके झाले आहे.