लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे जमीन विक्रीच्या वादातून मुलाने वयोवृद्ध आईचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सुमिंद्राबाई जाधव (वय ७०) यांच्या नावे असलेली शेती विकावी, असा आग्रह त्यांचा मुलगा काकासाहेब जाधव (वय ४८) मागील काही दिवसांपासून करत होता. मात्र आईने ठाम नकार दिल्याने काकासाहेब रागात होता. आई शेतावर एकटीच गेली असल्याचे समजताच तो शेतावर गेला आणि तिथे आईचा तोंड दाबून आणि गळा आवळून खून केला.
https://prahaar.in/2025/08/09/triple-murder-case-shakes-delhi-wife-and-two-daughters-brutally-murdered-on-raksha-bandhan-day/
गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह उसाच्या शेतात पुरून टाकण्यात आला. सुमिंद्राबाई बेपत्ता असल्याची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. चौकशीत आई-मुलामध्ये जमिनीच्या विक्रीवरून वाद असल्याचे उघड झाले.
यामुळे पोलिसांनी काकासाहेबाचा शोध सुरू केला, मात्र तो सापडले नव्हता. अखेर रेणापूर शिवारात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. दोन्ही मृतदेह उत्तरी तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, रेणापूर पोलीस ठाण्याचे पथक पुढील तपास करत आहे.