Home ताज्या घडामोडी पावसाळ्यातही सुरू राहिल नक्षलविरोधी मोहिम- अमित शाह

पावसाळ्यातही सुरू राहिल नक्षलविरोधी मोहिम- अमित शाह

पावसाळ्यातही सुरू राहिल नक्षलविरोधी मोहिम- अमित शाह

रायपूर : नक्षलवादी पावसाळ्यात घनदाट जंगलात लपून बसतात. परंतु, यंदा पावसाळ्यातही नक्षलवाद्यांच्या विरोधातील मोहिम तेवढ्याच तीव्रतेने सुरू राहिल असे इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलाय. छत्तीसगडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारने नक्षलवादाच्या उच्चाटनासाठी ३१  मार्च २०२६ तारीख निश्चित केली आहे. त्यादिशेने केंद्र आणि राज्य सरकार काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी अमित शहा म्हणाले की, पूर्वी नक्षलवादी पावसाचा फायदा घेऊन जंगलात लपून बसायचे, परंतु आता असे होणार नाही. नक्षलवाद्यांना पावसाळ्यातही शांत झोपू दिले जाणार नाही. नक्षलवादाविरुद्धची कारवाई पावसातही सुरुच राहील. ही कारवाई कोणत्याही हवामानावर अवलंबून राहणार नाही. आमचे सुरक्षा दल पूर्ण ताकदीने काम करत आहेत आणि ही लढाई निर्णायक वळणावर पोहोचली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवावीत. आत्मसमर्पण करण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नसल्याचे शाह यांनी सांगितले.

यावेळी शाह यांनी छत्तीसगड सरकारच्या नवीन नक्षलवादी आत्मसमर्पण धोरणाचे कौतुक केले. हा एक सकारात्मक पुढाकार असून यामुळे मुख्य प्रवाहात परतणाऱ्यांना चांगले भविष्य आणि सन्माननीय जीवन जगण्याची संधी मिळेल. त्यांनी नक्षलवाद्यांना हिंसाचाराचा मार्ग सोडून देशाच्या विकास प्रवासात भागीदार होण्याचे आवाहन केले. आपल्या भाषणात शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “विकसित भारत” च्या दृष्टिकोनाचा उल्लेख करून सांगितले की, हे स्वप्न केवळ पायाभूत सुविधा, नवोपक्रम आणि आर्थिक प्रगतीपुरते मर्यादित नाही, तर ते वेळेवर न्याय आणि सामाजिक स्थिरतेवर देखील लक्ष केंद्रित करते. नक्षलवादसारख्या समस्यांपासून भारताला मुक्त करूनच खरा विकास सुनिश्चित करता येईल.

गेल्या काही वर्षांत नक्षलग्रस्त भागात पोलिस दल तैनात करणे, रस्ते आणि दळणवळणाचे जाळे वाढवणे आणि स्थानिक लोकांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा पुरवण्याचे व्यापक काम करण्यात आले आहे. यामुळे नक्षलवाद्यांचा आधार कमकुवत झाला असून, अनेक भाग त्यांच्यापासून मुक्त झाले आहेत. केंद्र आणि राज्याने या एकत्रितपणे काम करत राहिल्यास नक्षलवादाचे समूळ उच्चाटन नियोजित वेळेपूर्वीच करता येईल, असा विश्वास गृहमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.