Home ताज्या घडामोडी वारीनंतर भक्ती-शक्ती चौकात ‘स्वच्छता वारी’: ‘earth’ आणि ‘पिंची’ संस्थांचा अभिनव उपक्रम

वारीनंतर भक्ती-शक्ती चौकात ‘स्वच्छता वारी’: ‘earth’ आणि ‘पिंची’ संस्थांचा अभिनव उपक्रम

वारीनंतर भक्ती-शक्ती चौकात ‘स्वच्छता वारी’: ‘earth’ आणि ‘पिंची’ संस्थांचा अभिनव उपक्रम

पिंपरी: संत तुकाराम महाराजांची पालखी १८ जून रोजी देहूतून प्रस्थान करून १९ जून रोजी पिंपरीतील भक्ती-शक्ती चौकात पोहोचली. लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने या पवित्र वारीत सहभागी झाले, मात्र या भक्तिमय सोहळ्यानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येकडे आता संयुक्त राष्ट्रसंघ मान्यताप्राप्त ‘earth’ आणि ‘पिंची’ या दोन संस्थांनी लक्ष वेधले आहे. या दोन्ही संस्थांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसोबत (PCMC) मिळून भक्ती-शक्ती चौकात स्वच्छता मोहीम राबवण्याचा अभिनव संकल्प केला आहे.

वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक संस्था, नागरिक आणि हॉटेल्स अन्न-पाण्याची व्यवस्था करतात. परंतु, वारी संपल्यानंतर मागे राहणारा कचऱ्याचा डोंगर हा शहराच्या सौंदर्यावर आणि पर्यावरणावर नकारात्मक परिणाम करतो. “स्वच्छता हा खरा धर्म आहे, गलिच्छपणा हा पाप आहे,” असे सांगणाऱ्या संत गाडगे महाराजांचे तत्त्व वारीनंतरही जपले जावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या स्वच्छता मोहिमेत ‘earth’ आणि ‘पिंची’ या दोन्ही संस्थांच्या १५० महिला स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. वारीनंतर झालेल्या कचऱ्याच्या साफसफाईची जबाबदारी त्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसोबत (PCMC) उचलणार आहेत.

या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या ‘earth’ एनजीओच्या सीईओ प्रविणा कलमे आणि ‘पिंची’ च्या संस्थापक पूनम परदेशी यांनी सांगितले, “वारीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन केवळ प्रशासनासाठी खूप कठीण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ या स्तुत्य उपक्रमाला सहकार्य करण्याच्या हेतूने आम्ही ‘earth’ आणि ‘पिंची’ संस्थांनी मिळून हा पुढाकार घेतला आहे. ही केवळ स्वच्छतेची जबाबदारी नाही, तर ही आमच्या विठोबाप्रती असलेली भक्तीची आणि सामाजिक जाणिवेची अभिव्यक्ती आहे. भक्तीसोबत आपण आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाची जबाबदारीही घेतली पाहिजे, असा एक महत्त्वाचा सामाजिक संदेशही या उपक्रमातून दिला जात आहे.”