अहमदाबाद : एअर इंडियाच्या अपघात झालेल्या AI 171 विमानाचा Black Box सापडला आहे. याआधी विमानाचा डीव्हीआर अर्थात डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर पण सापडला आहे. ब्लॅक बॉक्स आणि डीव्हीआर सापडल्यामुळे विमानाच्या अपघाताचे कारण शोधण्यास मदत होणार आहे. विमान ज्या इमारतीच्या छताला धडकले त्याच इमारतीच्या गच्चीवर डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर अर्थात डीएफडीआर ज्याला ब्लॅक बॉक्स असेही म्हणतात तो सापडला आहे.
भारताच्या एअरक्राफ्ट अॅक्सीडेंट इनव्हेस्टिगेशन ब्युरो अर्थात एएआयबीने विमानाच्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. ब्लॅक बॉक्स आणि डीव्हीआर सापडल्यामुळे तपासाचे काम वेग घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एएआयबीचे ४० जणांचे पथक नियुक्त केले आहे. या पथकाने त्यांचे काम सुरू केले आहे.
याआधी अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणाऱ्या AI 171 विमानाला गुरुवार १२ जून २०२५ रोजी दुपारी अपघात झाला. तब्बल १२ वर्षे जुने बोईंग ७८७-८ विमान अहमदाबादहून दुपारी १.३८ वाजता निघाले होते, त्यात २३० प्रवासी आणि १२ कर्मचारी होते. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळले. विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. एकमेव वाचलेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रवाशांमध्ये १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, ७ पोर्तुगीज नागरिक आणि १ कॅनेडियन नागरिक आहे. वाचलेली व्यक्ती भारतीय वंशाची ब्रिटिश नागरिक आहे; असे एअर इंडियाने जाहीर केले. तर विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. विमान जिथे कोसळले त्या भागातील २४ नागरिकांचाही मृत्यू झाला. यामुळे मृतांची एकूण संख्या २६५ झाली; असे अहमदाबाद पोलिसांनी सांगितले.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने अर्थात डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार विमानाने गुरुवार १२ जून २०२५ रोजी दुपारी १.३८ वाजता उड्डाण केले आणि काही सेकंदातच ‘मेडे’ असा संकटाचा इशारा देणारा पुकारा केला. याला प्रतिसाद देत विमान वाहतूक नियंत्रण कक्षाने नेमके काय घडले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण विमानातून प्रतिसाद मिळाला नाही आणि अपघात झाला. धावपट्टी क्रमांक २३ वरुन उड्डाण केलेले विमान विमानतळाच्या परिघाबाहेर मेघानी परिसरात कोसळले. विमान कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या नेतृत्वाखाली होते, त्यांच्यासोबत प्रथम अधिकारी (फर्स्ट ऑफिसर) म्हणून क्लाइव्ह कुंदर काम करत होते.
https://prahaar.in/2025/06/13/plane-crash-in-ahmedabad-what-has-happened-so-far/
टाटा समुहाने जाहीर केली मदत
विमान दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत करणार असल्याचे टाटा समुहाने जाहीर केले. जखमींचा वैद्यकीय खर्च करू तसेच बी. जे. मेडिकलच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करू; असेही टाटा समुहाने जाहीर केले.
नेत्यांनी घेतला आढावा
पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नागरी विमान वाहतूक मंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री, गुजरातचे मुख्यमंत्री, एअर इंडिया कंपनीचे अधिकारी आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच जखमींची विचारपूस केली आणि मृतांच्या नातलगांचे सांत्वन केले. पंतप्रधान मोदींनी अपघातात बचावलेल्या रमेश विश्वासकुमार यांचीही भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली.