मुंबई : आयपीएल २०२५ मध्ये प्ले ऑफ राउंडसाठी अर्थात पुढील फेरीसाठी पात्र ठरलेल्या संघांमध्ये मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या चार संघांचा समावेश आहे. यापैकी मुंबईचे आतापर्यंत १३ साखळी सामने झाले आहेत. यातील आठ सामन्यांमध्ये मुंबईचा विजय झाला आहे. मुंबईचा संघ पाच सामन्यांत हरला आहे. यामुळे गुणतक्त्यात १६ गुणांसह मुंबई चौथ्या स्थानी आहे. दिल्ली विरुद्धच्या विजयानंतर मुंबई चौथ्या स्थानी पाय घट्ट रोवून उभी आहे. मुंबईची सरासरी धावगती (नेट रनरेट) +१.२९२ आहे. मुंबईच्या या कामगिरीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची महत्त्वाची भूमिका आहे.
दुखापतीमुळे मुंबई इंडियन्स सुरुवातीच्या सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराह खेळला नव्हता. या सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला. पण बुमराह परतला आणि मुंबई इंडियन्सच्या कामगिरीत सुधारणा झाली. यामुळे जसप्रीत बुमराहची एन्ट्री मुंबई इंडियन्ससाठी फलंदायी ठरली आहे.
मुंबई इंडियन्सची आयपीएल २०२५ मधील कामगिरी
- २३ मार्च – चेन्नई सुपरकिंग्सचा चार गडी राखून विजय – बुमराह खेळला नाही
- २९ मार्च – गुजरात टायटन्सचा ३६ धावांनी विजय – बुमराह खेळला नाही
- ३१ मार्च – कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा आठ गडी राखून विजय – बुमराह खेळला नाही
- ४ एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्सचा १२ धावांनी विजय – बुमराह खेळला नाही
- ७ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा १२ धावांनी विजय – बुमराह खेळला; दुखापतीतून सावरला पण सामन्यात प्रभाव दिसला नाही
- १३ एप्रिल – दिल्ली विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी विजय – बुमराह खेळला; एक बळी घेतला
- १७ एप्रिल – हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा चार गडी राखून विजय – बुमराह खेळला; एक बळी घेतला
- २० एप्रिल – चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा नऊ गडी राखून विजय – बुमराह खेळला; दोन बळी घेतले
- २३ एप्रिल – हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सात गडी राखून विजय – बुमराह खेळला; एक बळी घेतला
- २७ एप्रिल – लखनऊ विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ५४ धावांनी विजय – बुमराह खेळला; चार बळी घेतले
- १ मे – राजस्थान विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा १०० धावांनी विजय – बुमराह खेळला; दोन बळी घेतले
- ६ मे – गुजरात टायटन्सचा ३ गडी राखून डकवर्थ लुईसने विजय – बुमराह खेळला; दोन बळी घेतले
- २१ मे – दिल्ली विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ५९ धावांनी विजय – बुमराह खेळला; तीन बळी घेतले