छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे कन्नड तालुक्यात एका लग्न समारंभातील जेवणातून तब्बल ६०० जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. सध्या सर्व पीडितांवर खाजगी तसेच सरकारी रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. मात्र या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
https://prahaar.in/2025/04/27/a-rare-rajyoga-will-be-formed-on-akshaya-tritiya-after-100-years-good-days-will-begin-for-these-zodiac-signs/
नेमकं प्रकरण काय?
अंबाडा येथे शुक्रवारी आदिवासी ठाकर समाजातील आठ मुलींचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यामध्ये अंबाळासह महादेव खोरा, तांदूळवाडी, घुसुर आणि इतर ३२ ठाकरवाड्यातील वऱ्हाडी आले होते. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर विवाहासाठी आलेल्या सर्व मंडळींनी जेवण केले. मात्र या जेवणातून अनेकांना उलटी आणि चक्कर येण्यास सुरुवात झाली. एकामागोमाग एक जण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर विषबाधा झाल्याचे समोर आले.
या विवाहसोहळ्यात अंबाला येथील ग्रामस्थांसह कळंकी, महादेवखोरा, तांदुळवाडी, घुसुर, निमडोंगरी, शिपघाट, कोळवाडी, खोलापूर, धामडोह, ठाकुरवाडी, कन्नड तालुक्यासह निरगुडी पिंपरी तसेच नाशिक, जळगावमधील ३२ ठाकरवाड्यातील पाहुण्यांनी विविध गावातील जवळपास ६०० जणांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली. या घटनेत सुरेश गुलाब मधे (८) या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १७ लोकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सध्या गंभीर प्रकृती असणाऱ्या पीडितांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काही रुग्णांवर करंजखेड येथील ग्रामीण रुग्णालयात तर काही जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र विषबाधा कोणत्या कारणामुळे झाले हे अद्याप समोर आले नाही.