मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे उष्णतेच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. अशातच आता हे तापमान आणखी वाढणार (Heat Wave) असल्याचा हवामान विभागाने (Meteorological Department) इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेऊनच बाहेर पडा असे आवाहन केले आहे.
https://prahaar.in/2025/04/17/you-can-reach-mumbai-from-navi-mumbai-in-half-an-hour-both-airports-will-be-connected-to-the-metro/
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काही भागात पावसाचे वातावरण असले तरी बहुतांश भागात उष्ण आणि दमट हवामान आहे. दरम्यान, पुढील ४ ते ५ दिवस राज्यातील हवामान असेच राहणार आहे. गुजरातसह पश्चिम राजस्थानमधील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर गुजरातचा काही भाग, केरळ आणि माहे तसेच महाराष्ट्रातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात २० एप्रिलपर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
काही भागात पावसाची शक्यता
पूर्व आणि ईशान्य भारतात पुढील ५ दिवसांत वीज आणि जोरदार वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भ आणि छत्तीसगडच्या मैदानांवर उद्या विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडेल. तर १८ एप्रिल म्हणजेच उद्या बिहार, आसाम आणि मेघालय, अरुणाचल प्रदेशमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान मुसळधार पाऊस, तर पश्चिम बंगाल व बिहारमध्ये १७ व १८ एप्रिलला वादळासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. (Rain Alert)
दक्षिण भारतातील तामिळनाडू, पुडुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकमध्ये पुढील ५ दिवस विजांसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. केरळ व माहे येथे १७ ते १९ एप्रिलदरम्यान जोरदार वारे व विजांचा संभव असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.