मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Employees) पगार नेहमीच रखडला जातो. मात्र आता एस टी कर्मचाऱ्यांना निराश करणारा एक निर्णय प्रशासनाने जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा केवळ ५६ टक्के पगार (ST Employees Salary) मिळणार आहे. पहिल्यांदाच इतका कमी पगार कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी संघटनेकडून संताप व्यक्त करण्यात आला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
https://prahaar.in/2025/04/10/builder-from-navi-mumbai-shot-at-in-chembur-area-condition-stable-mumbai/
मिळालेल्या माहितीनुसार, निधी नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी झाल्याचे समोर आले आहे. मात्र, आधीच अपुरा पगार आणि त्यात जर फक्त ५६ टक्के पगार मिळणार असेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं असा प्रश्न महाराष्ट्र एसटी कर्मचारी सरकारकडे उपस्थित करत आहेत. तसेच सरकारने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. अन्यथा आम्ही कोणत्याही क्षणी आंदोलनाची भूमिका घेऊ असा इशारा एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांची तक्रार
एस टी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. त्यात २०१८ पासूनचा महागाई भत्ता थकीत आहे. हायकोर्टाचे भत्ता एकरकमी द्या असे आदेश दिले आहेत, तरी कर्मचाऱ्यांचा ५६ टक्के महागाई भत्ता थकीत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार ७ तारखेला होत नाहीत. पगाराची कोणतीही निश्चित तारीख नाही. एसटीचं रोज सरासरी २२ कोटी उत्पन्न म्हणजे महिन्याला ६६० ते ७०० कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न आहे. कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगारासाठी केवळ ४४० कोटी रुपये लागता. मात्र उत्पन्न ७०० कोटी असूनही पूर्ण पगार आणि जो पगार दिला जातो तोही वेळेवर नाही. तालुकास्तरावर घरभाडं ८ टक्के असूनही ७ टक्केच दिले जाते, मात्र तेही वेळेवर दिले जात नाही, अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे.