उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मुंबई : कार्यकर्त्यांनी पेटवा मशाल, आम्ही झोपतो खुशाल अशी, यांची अवस्था असून त्यांनी कार्यकर्त्यांना कचरा समजला. त्यामुळे त्यांना आम्ही हायव्होल्टेज शॉक दिला, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत म्हटले. मुंबईच्या रस्त्यांवरून हे प्रश्न विचारतात, एवढी वर्षे डांबराचे सांबर कुणी खाल्ले हे स्पष्ट करावे. आरशात सांगून वारसा सांगता येत नसल्याचे म्हणत शिंदेंनी ठाकरे पिता-पुत्रांना टोला लगावला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले की, सध्या काँक्रीटचे रस्ते करणे सुरू आहे. त्यामुळे लोकांना थोडा त्रास होतोय; परंतु त्यानंतर पुढील २५ वर्षे मुंबईत खड्डे दिसणार नाहीत. डांबरात हात काळे करण्याची संधी आता तुम्हाला मिळणार नाही. पोपटाचा जीव पिंजऱ्यात असतो, यांचा जीव मुंबईतील रस्ते आहेत.
https://prahaar.in/2025/03/26/kabar-and-kamra-in-the-minds-of-the-opposition-chief-minister-fadnaviss-attack-after-the-session-ends/
एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मर्चंट नेव्हीच्या अधिकाऱ्याला मारताना कुठे होते तुमच्या हातातले संविधान? प्रदीप मोरेला मारले तेव्हा संविधान कुठे होते? केतकी चितळेला तुरुंगात डांबले, तेव्हा संविधान कुठे होते? मलिष्काच्या गाण्यामुळे तुम्हाला पोटदुखी झाली, तेव्हा संविधान कुठे होते? हनुमान चालिसा म्हटली म्हणून राणा दाम्पत्याला तुरुंगात धाडले, तेव्हा संविधान कुठे होते? खोट्या केसेस करून देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात पाठवण्याचे षडयंत्र रचले, तेव्हा कुठे होते संविधान? उद्योजकाच्या घरासमोर बॉम्ब पेरताना कुठे होते संविधान? वाझे हा काही लादेन नाही म्हणताना संविधान आठवले नाही का? नारायण राणेंना अटक करताना संविधान आठवले नाही का? कंगनाच्या ऑफिसवर बुलडोझर चालवला, तेव्हा कुठे होते संविधान? फडतूस म्हणाले, त्यांच्या पायाशी लोटांगण घालताना संविधान कुठे होते?” असे तिखट प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थित केले आहेत.