दंगलीनंतर आता शहरात तणावपूर्ण शांतता
नागपूर : नागपुरात सोमवारी झालेल्या दंगलीनंतर शहराच्या काही भागात संचारबंदी लावण्यात आली आहे. रात्रभर पोलिस परिस्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्नरत होते. त्यासाठी कलम १६३ अनंतर्गत संवेदनशील वस्त्यांमध्ये संचारबंदी लावण्यात आली असून सध्या तणावपूर्ण शांतता पसरली आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार, सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती होती. यानिमित्ताने विश्व हिंदू परिषदेने छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन केले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगजेबची कबर हटवण्यात यावी अशी या आंदोलकांची मागणी होती. यावेळी आंदोलकांनी औरंगजेबचे फोटो आणि प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवला. अतिशय शांततेत हे आंदोलन पार पडले. त्यानंतर सोशल मिडीयावर काही अफवांचे व्हिडीओ आणि पोस्ट व्हायरल झाल्यात. त्यानंतर संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमाराला चिटणीस पार्कच्या समोर असलेल्या कांग्रेसच्या देवडिया भवन कार्यालयाच्या शेजारी असलेल्या धार्मिक स्थळाच्या समोर लोक एकत्र झाले. त्यानंतर हा जमाव चाल करून छत्रपती चौकाच्या दिशेने निघाला. यावेळी या जमावातून आक्षेपार्ह घोषणाबाजी आणि दगडफेक करण्यात आली.
Israel : इस्रायलचा गाझामध्ये विद्ध्वंस, २३२ जणांचा मृत्यू ३०० हून अधिक जखमी
दंगलखोरांच्या दगडफेकीत अनेक पोलिस देखील जखमी झाले. तसेच जमावाच्या हल्ल्यात ४ पोलिस अधिकारी जखमी झालेत. पोलिस उपायुक्त, निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार झाल्यामुळे ते रक्तबंबाळ झाले. तर दगडफेकीत डीसीपी शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंज्यूरी झाली आहे. त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर डीसीपी राहुल मदने देखील दगडफेकीत किरकोळ जखमी झाले आहेत.
वातावरण पूर्ववत करण्यासाठी पोलिसांनी रात्री नागपूर शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावला असून पुढील आदेश येईपर्यंत हा कर्फ्यू लागू राहील, असे पोलिस आयुक्त डॉ. रविंदर कुमार सिंगल यांनी सांगितले. दरम्यान आज, मंगळवारी नागपुरात तणावपूर्ण शांतता आहे.