मुंबई ( अलिशा खेडेकर ) : अनेक क्रिकेटवीरांचे स्वप्न असलेल्या वानखेडे मैदानाला काल ५० वर्ष पूर्ण झाली. मोठ-मोठे दिग्गज खेळाडू वानखेडेच्या मातीत तयार झाले. सुनील गावसकर ते सचिन तेंडुलकर सारख्या दिग्गज खेळाडूंनी याच मातीत सराव करून भल्याभल्यांना मागे टाकत भारताचं क्रिकेट मधलं नाव उंचावलं आहे. या वानखेडे मैदानाचा क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने रविवारी वानखेडे स्टेडियमचा सुवर्णमहोत्सव दिमाखात साजरा झाला. याचे औचित्य साधून सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, डायना एडुल्जी, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या क्रिकेटवीरांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी वानखेडेमधील ५० वर्षाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
https://prahaar.in/2025/01/20/oh-my-even-though-i-got-the-guardian-minister-post-pankutai-is-still-angry/
या कार्यक्रमादरम्यान सचिनची विशेष मुलाखत घेण्यात आली तेव्हा सचिन म्हणाला “वानखेडे स्टेडियम मी वयाच्या दहाव्या वर्षी पाहिले होते. त्यावेळी मला माझ्या साहित्य सहवासमधील मित्रांनी लपवून आणले होते. हे स्टेडियम पाहत्याक्षणी मी प्रभावित झालो आणि तेव्हा येथे खेळण्याचे ठरविले होते. तिथून माझा क्रिकेट प्रवास सुरू झाला. १९८३ सालच्या विश्वचषकापासून मी खूप प्रेरित झालो. दिग्गज खेळाडूंना विश्वचषक उंचावताना पाहून आपणही असा चषक पकडावा, असे स्वप्न पाहिले. अखेर हे स्वप्न वानखेडे स्टेडियमवर साकार झाले. त्यामुळे २०११ साली वानखेडे स्टेडियमवर पटकावलेले विश्वविजेतेपद माझ्यासाठी खूप विशेष आठवण आहे. वानखेडेवर सरावादरम्यानच्या बऱ्याच आठवणी आहेत. मात्र वडापाव म्हटला की एक किस्सा मला आवर्जून आठवतो तो म्हणजे वानखेडेवर सरावाच्या दिवशी सर्व डब्याला काहीना काही आणायचे मात्र एक टीम मेंबर असा होता कि जो नेहमी काहीतरी स्पेशल आणायचा आणि त्या दिवशी त्याने डब्ब्यात बटाटे वडे आणले होते. त्याने डब्बा उघडताच आलेल्या सुगंधावरून आम्ही ओळखले डब्ब्यात काय असेल आणि मोठ्या हुशारीने त्याच्या डब्यातले बटाटे वडे खाऊन टाकले. त्या टीम मेंबरला समजल्यावर तो चिडला आणि रागाने तुमच्या पोटात दुखेल असं म्हणू लागला.” असे सचिन म्हणाला.