मुंबई : पद्मश्री पुरस्कार मिळालेली चित्रपट अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) हिने मुंबईतील पाली हिल येथील तिचा बंगला अवघ्या ३२ कोटींना विकला आहे. बंगला विकण्यामागची तिची मजबुरी तिने सांगितली असून तिने तो आलिशान बंगला का विकला त्याचे कारण समोर आले आहे.
कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘माझा चित्रपट ‘इमर्जन्सी’ (Emergency) रिलीज होणार होता. या चित्रपटासाठी मी माझी सर्व वैयक्तिक मालमत्ता गुंतवली होती. मात्र सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र न मिळाल्याने हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही.
मालमत्ता फक्त संकटकाळासाठी असते. त्यामुळेच तिने हा बंगला पैशासाठी विकला. कंगनाने या बंगल्याची किंमत ४० कोटी रुपये ठेवली होती. पकंतु तिला पैशांची गरज होती. यामुळे मजबुरीमुळे तिने तो बंगला अखेर ३२ कोटींना विकला.
https://prahaar.in/2024/09/18/kangana-ranauts-troubles-increase-chandigarh-court-issues-notice-to-the-film-emergency/
कंगनाने २०१७ मध्ये हा बंगला २० कोटी रुपयांना खरेदी केला होता. या बंगल्यातून त्यांचे कार्यालयही चालवले जात होत. हा बंगला विकत घेतल्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये तेथे मणिकर्णिका फिल्म्ससाठी कार्यालय सुरू केले होते.
सप्टेंबर २०२० मध्ये कंगनाच्या या बंगल्याचे मुंबई महापालिकेने खूप नुकसान केले होते. कथित अनधिकृत बांधकामाच्या आधारे ते पाडण्यात आले होते. ज्याची त्यावेळी खूप चर्चा झाली.
अंधेरीत नवीन कार्यालयाची जागा १.५६ कोटींमध्ये खरेदी
वांद्रे येथील बंगला विकल्यानंतर कंगनाने अंधेरी येथे १.५६ कोटी रुपयांना नवीन कार्यालय विकत घेतले आहे. ४०७ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले हे ऑफिस १९व्या मजल्यावर ३८,३९१ रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने खरेदी केल्याचे सांगितले जाते.
कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट ६ सप्टेंबरला रिलीज होणार होता. मात्र सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र न मिळाल्याने त्याचे प्रदर्शन थांबवण्यात आले. कंगनाने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चित्रपट पुढे ढकलल्याची माहिती दिली होती. कंगनाने लिहिले होते- जड अंत:करणाने मी जाहीर करते की, माझ्या दिग्दर्शित ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे, आम्ही अजूनही सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राची वाट पाहत आहोत, लवकरच रिलीजची नवीन तारीख जाहीर केली जाईल. मात्र अद्यापही सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र न मिळाल्याने पुढे काय होणार? घरदार विकावे लागलेल्या कंगनाच्या या वादग्रस्त चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळेल का? चित्रपट चालेल का? असे अनेक प्रश्न सध्या चर्चिले जात आहेत.