Home ब्रेकिंग न्यूज उद्धटपंतांची ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ झालेय!

उद्धटपंतांची ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ झालेय!

उद्धटपंतांची ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ झालेय!

फडणवीसांचे राजकारण संपवायला उद्धव ठाकरेंना १०० जन्म घ्यावे लागतील

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी धमकीचा इशारा देताच भाजपा नेत्यांनी चौफेर हल्लाबोल करत उद्धटपंतांना सळो की पळो करुन सोडले आहे. देवेंद्र फडणवीसांचे राजकारण संपवायला उद्धव ठाकरेंना १०० जन्म घ्यावे लागतील, असा पलटवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तर फडणवीस यांच्या नावाची कावीळ झालेले अनेक कावीळग्रस्त सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत आहेत, त्यातील एक उद्धटपंत तुम्ही आहात! तुमची ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ झाली आहे! अशी खरमरीत टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईतील पक्षाच्या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ललकारले होते. आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहील, अशा भाषेत उद्धव यांनी फडणवीसांना आव्हान दिले होते. या वक्तव्यानंतर भाजप नेते उद्धव ठाकरे यांच्यावर अक्षरश: तुटून पडले.

टीका करण्याची उद्धव ठाकरे यांची पात्रता नाही

आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याविरोधात षडयंत्र रचून त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी जंगजंग पछाडलं. पण मायबाप जनतेच्या आशीर्वादानं उद्धव ठाकरे देवेंद्रजींना तुरुंगात टाकू शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर तर टीका करण्याची उद्धव ठाकरे यांची पात्रताही नाही, त्यामुळे घाम फोडण्याची त्यांची भाषा हास्यास्पद आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसला, तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न केला. आता त्यांना संपविण्याची अहंकारी भाषा करताहेत, पण त्यांनी लक्षात ठेवावं, तुमचा हाच अहंकार जनता जनार्दन संपविल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्रजींच्या पाठीशी जनता आहे, परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. त्यांचं राजकारण संपविण्यासाठी उद्धव ठाकरे यांना शंभर जन्म घ्यावे लागतील, असे बावनकुळे यांनी म्हटले.

उद्धटपंतांना हिंदूंची एलर्जी!

हिंदुत्व सोडून आणि वडिलांच्या विचारांशी प्रतारणा करून तुम्ही दोन्ही काँग्रेसच्या मांडीवर बसून सत्ता उबवली. पण, उसने कर्तृत्व फार काळ टिकले नाही. ऊठसूठ देवेंद्रजींवर गरळ ओकण्यासाठी एकाला तुम्ही कायमचे पाळलेले आहेच. त्याने पक्षाचे वाटोळे केले, तरी तुमचे डोळे उघडत नाहीत, हे दुर्दैवं! त्याच्या पावलावर पाऊल टाकत तुमची ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ झाली आहे! उद्धटपंत, भ्रामक कल्पनेत वावरू नका, वास्तवाला सामोरे जा, असा थेट इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.

काँग्रेसच्या मांडीवर बसता,
राखण्यासाठी ‘हिरवी’ मर्जी!
मराठ्यांच्या महाराष्ट्रातच,
उद्धटपंतांना हिंदूंची एलर्जी!

सत्तेवर असताना घरी बसलात, सत्ता गेल्यावर तर कायमचे घरी बसणे नशिबी आले. उद्धटपंत, तुम्ही म्हणता ते एकदम मान्य.. महाराष्ट्रातील जनताच म्हणू लागली आहे, आम्हाला देवेंद्रजी पाहिजेत, बाकी सब झूठ हैं!, अशी खरमरीत टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

तुम्हाला फडणवीस शिंदे हेच पुरेसे आहेत

“मी सगळं सहन करुन उभा राहिलोय, आता एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन. लोकसभेला मोदी आले त्यामुळे गद्दाराचं कार्टे निवडून आले, असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिले. त्यानंतर “विधानसभेला मोदीजींची गरज नाही, तुम्हाला फडणवीस आणि शिंदे हेच पुरेसे आहेत”, असे प्रत्युत्तर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी दिले आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, फडणवीसांना व्यक्तिगत धमकी उद्धव ठाकरेंनी दिली आहे. भाजप धमक्यांना भीक घालत नाही. बाळासाहेबांचा वारसा सोडल्याचं यातून दिसून आलं. महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. मराठवाड्यात २० हजार कोटींची गुंतवणूक झाली, त्यावरून जनतेचं लक्ष विचलीत करण्यासाठी केलेलं विधान आहे. अपप्रवृत्तीचे देवेंद्र फडणवीस कर्दनकाळ आहेत. फडणवीस सर्वात लोकप्रिय नेते हे वारंवार सिद्ध झालंय. ठाकरेंनी सर्व परंपरा गुंडाळून ठेऊन नाक्यावर आणि बांधावर बोलावं तसं हमरीतुमरीचं विधान आहे.

पुढे बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, नडलो तर नडलो पण स्वतः मात्र बेक्कार पडलो अशी ठाकरेंची स्थिती आहे. पूर्वी किती खासदार होते आणि आता किती आहेत. अपयशात कर्तृत्व समजतय. मोदी कामातून जनतेला जिंकत आहेत. लोक विधानसभेत उत्तर देतील. उद्धव ठाकरे स्वतः गुर्मीत बोलतायत. उद्धव ठाकरेंना मुस्लिम आणि इतर मते मिळाली म्हणून काही जागा आल्या. विधानसभेला मोदीजींची गरज नाही, तुम्हाला फडणवीस शिंदे हेच पुरेसे आहेत. ज्या झाडाला फळ येतात त्यालाच लोक दगड मारतात, राज्यातील वांझोट्यांना कुणी दगड मारत नाही. वैफल्यातून ही भाषा आहे.

फडणवीसांना जितके दगड माराल, तेवढी त्यांना सहानुभूती मिळेल. हात उखडून फेकायची भाषा ते करतायत. त्यांनी कधी यापूर्वी असं काही केल्याचं ऐकिवात नाही. आमच्यासारखे बाळासाहेबांचे शिवसैनिक लोकांसाठी संघर्ष करायचो. अनिल देशमुख मुंबई पोलिस आयुक्तांना हाताशी धरून काय करत होतात. तू तरी राहशील किंवा मी राहील हे फडणवीसांनी कृतीतून दाखवून दिलंय, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.

महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरेंची लाज वाटतेय: केशव उपाध्ये

महाराष्ट्रातील जनतेला उद्धव ठाकरे आज तुमची लाज वाटते. महाराष्ट्रात समृद्ध परंपरा आहे. बाळासाहेब ठाकरे असतील शरद पवार आहेत, बाकी अन्य नेते आहेत. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन अशी मोठी परंपरा आहे. हे एकमेकांचे विरोधक होते. मतभेद होते. मात्र कोणीही कोणत्या नेत्यांनी एकमेकांना संपवण्याची भाषा केली नाही.

महाराष्ट्राच्या दुर्दैवाने तुम्ही मुख्यमंत्री होतात, असा मुख्यमंत्री जो कधी मंत्रालयात गेला नाही, ज्याने जनहिताचे काम केले नाही. तो काळही आम्ही बघितला. तुमच्या पासून कार्यकर्ते, आमदार, जनता गेली. मात्र, त्याचा दोष तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना देताय. मुख्यमंत्री असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते झालं नाही कारण सत्य हे सत्य असते. ही भाषा एका माजी मुख्यमंत्र्याला शोभणारी नाही. तुम्हाला लोकांनी कधी स्वीकारलं नाही, तरीही तुम्ही मुख्यमंत्री झालात. येत्या काळात जनता ठरवणार आहे कोणाला त्या पदावर बसवायचं. तुमच्या या सूडबुद्धीच्या विधानाने जनतेला मात्र लाज वाटते, असे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले.