Home ताज्या घडामोडी बिहारमध्ये भूकंपाचे संकेत? जेडीयू भाजपासोबत येणार!

बिहारमध्ये भूकंपाचे संकेत? जेडीयू भाजपासोबत येणार!

0
बिहारमध्ये भूकंपाचे संकेत? जेडीयू भाजपासोबत येणार!

नितीश कुमार होणार जेडीयूचे अध्यक्ष, ललन सिंहांचा राजीनामा

पाटना : जनता दल यूनायटेड (जेडीयू) या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील ९० टक्के नेते भाजपासोबत पुन्हा आघाडी करण्यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे नेत्यांचा दबाव आणि इंडिया आघाडीकडून झालेला भ्रमनिरास, या पार्श्वभूमीवर नितीश कुमार (Nitish Kumar) पुन्हा भाजपासोबत येण्याच्या तयारीत असून बिहारमध्ये पुन्हा राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जेडीयूच्या (JDU) राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक नवी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नितीश कुमार हे जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. ललन सिंह हे जेडीयूच्या अध्यक्षपदावरून दूर होतील, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. या चर्चेवर आज अखेर शिक्कामोर्तब झाले. याबाबत जेडीयू नेते आणि बिहारचे कॅबिनेट मंत्री विजयकुमार चौधरी यांनी माध्यमांसमोर याबाबत माहिती दिली.

“मी लोकसभा निवडणूक लढवणार असून या निवडणुकीत मी व्यग्र राहणार असल्याने अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे ललन सिंह यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सांगितले. त्यामुळे नितीश कुमार यांनी अध्यक्ष व्हावे असा प्रस्ताव आम्ही ठेवला असून हा प्रस्ताव स्वीकारल्यास नितीश कुमार हे जेडीयूचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष होतील,” अशी माहिती विजयकुमार चौधरी यांनी दिली.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पाळली नसल्याचे सांगत नितीश कुमार यांनी भाजपविरोधात दंड थोपटले आणि विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र इंडिया आघाडीच्या स्थापनेपासून त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी घडत नसल्याने त्यांनी नाराजीचा सूर आळवायला सुरुवात केली. ललन सिंह यांच्या पुढाकाराने मागील वर्षी नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि आरजेडीसोबत महाआघाडी केली होती. भाजपासोबतची युती तोडण्यात ललन सिंह यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. मात्र आता पक्ष पुन्हा भाजपासोबत जाण्याच्या तयारीत असल्यानेच ललन सिंह यांनी जेडीयूचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.