Home महत्वाची बातमी तेव्हा का नाही घातला बहिष्कार?

तेव्हा का नाही घातला बहिष्कार?

तेव्हा का नाही घातला बहिष्कार?

फडणवीसांचा विरोधकांना सवाल

मुंबई : इतिहासातील अनेक दाखले देत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी नवीन संसदेच्या उद्घाटनावर घातलेल्या बहिष्कारावर टीकास्त्र सोडले आहे.

येत्या २८ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती किंवा लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते व्हावे. आता विरोधकांनी पुढचे पाऊल गाठत या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यावर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

फडणवीस म्हणाले की, ‘हे केवळ संसद भवन नाही, ते १४० कोटी लोकांच्या आस्थेचे मंदिर आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घालणे म्हणजे लोकशाहीला नाकारण्यासारखे आहे. ते एकीकडे म्हणतात पंतप्रधानांनी नाही तर राष्ट्रपतींनी संसदेचे उद्घाटन करावे. त्यांना मी सांगतो की, इंदिरा गांधीजींनी जेव्हा संसदेच्या अॅएक्स बिल्डींगचे उद्घाटन केले तेव्हा तुम्ही बहिष्कार का नाही घातला? इंदिराजींनी महाराष्ट्राच्या विधान भवनाचे उद्घाटन केले तेव्हा ते राज्यपालांच्या हस्ते का करण्यात आले नाही?’

‘तसेच राजीव गांधींनी संसदेच्या ग्रंथालयाचे उद्घाटन केले तेव्हा राष्ट्रपतींची का आठवण आली नाही? त्याचबरोबर तामिळनाडूच्या विधानसभेचे उद्घाटन देखील सोनियांनी केले. तिकडे बिहारमध्ये नितिश कुमारांनी त्यांच्या सेंट्रल हॉलचे उद्घाटन केले. त्यावेळी जेडीयूने बहिष्कार का नाही घातला? युपीएचे सरकार असताना मनमोहन सिंग आणि सोनियांनी मणिपूरच्या इम्फाळमध्ये तेथील विधान भवनाचे उद्घाटन केले होते. तेव्हा राज्यपालांच्या हस्ते ते का करण्यात आले नाही?’ अशी उदाहरणे देत आणि असा प्रश्नांचा भडीमार करत फडणवीस यांनी विरोधकांची बोलती बंद केली आहे.

पुढे फडणवीस असे देखील म्हणाले की, देशात पहिले फक्त कॉऊंसिल हॉल होता. आता संसद निर्माण झाली आहे. त्याला विरोध का? हे सगळे लोक खुर्चीचे सौदागर आहेत. सत्तेचे सौदागर आहेत. ते मोदीजींचा मुकाबला करू शकत नाहीत. त्यासाठी ते एकत्र आले आहेत. मात्र मी जे उदाहरण दिले त्यावेळी बहिष्कार का टाकला नाही? याचे आधी उत्तर द्या, असे फडणवीस म्हणाले.

विरोधकांकडे ना नेता, ना नीती, ना नियत आहे. विरोधकांना मोदींची लोकप्रियता पाहवत नाही. पण यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.