पक्षात दोन मतप्रवाह असल्याची चर्चा गैरवाजवी
https://prahaar.in/2026/08/07/ahilyanagar-crime-news-case-registered-against-the-supervisors-son/
मुंबई : प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच सुनेत्रा पवार यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वर्तुळात सुरू झालेल्या राजकीय चर्चांवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. “प्रशांत किशोर हे आमच्या पक्षासाठी राजकीय सल्लागार म्हणून काम करत आहेत, अशी कोणतीही माहिती माझ्याकडे नाही. जर अशी एखादी नियुक्ती झाली असती, तर प्रदेशाध्यक्ष म्हणून मला ती नक्कीच माहीत असती,” असे विधान तटकरे यांनी केले. तसेच, पक्षात दोन मतप्रवाह किंवा अंतर्गत मतभेद सुरू असल्याच्या चर्चा या वावड्या असून त्या पूर्णपणे गैरवाजवी असल्याचे त्यांनी सांगितले.
https://prahaar.in/2026/08/07/have-you-ever-had-abc-juice-how-is-it-made-and-what-are-its-benefits-for-the-body/
प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यातील भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सुनील तटकरे यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली. तटकरे म्हणाले की, “प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतलेली भेट ही औपचारिक होती. आमच्या पक्षात राज्य अथवा केंद्रीय नेतृत्वाला सध्या बाहेरील कोणत्याही राजकीय सल्लागाराची गरज भासलेली नाही. आम्ही जेव्हा ‘एनडीए’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तो पक्षातील सर्व नेत्यांनी मिळून आणि अत्यंत हिरीरीने घेतला होता. हा निर्णय घेतल्यानंतर महायुतीचे विचार आणि कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आणि नेत्याने अहोरात्र कष्ट घेतले आहेत. त्या सामूहिक मेहनतीचे फलित म्हणून आपल्याला यश मिळाले आहे. त्यामुळे पक्षात कोणतेही दोन तट किंवा मतप्रवाह निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर काही नेते नाराज असल्याच्या वावड्या गेल्या काही दिवसांपासून उठवल्या जात होत्या. यावर तटकरे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. “काही माध्यमांमध्ये माझ्याबद्दल नाराजी असल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने दिल्या जात आहेत. तुमचे सूत्र काय सांगते याच्याशी मला देणेघेणे नाही, कारण मला माझे ‘गोत्र’ नीट माहीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात उभा करण्यासाठी ज्या मोजक्या नेत्यांनी संपूर्ण राज्य पालथे घातले, त्यामध्ये माझा समावेश आहे. मी गेली ४१ वर्षे सक्रिय राजकारणात आहे. १९८५ मध्ये काँग्रेसचा रोहा तालुका सरचिटणीस म्हणून माझ्या कारकिर्दीची सुरुवात झाली आणि त्याच वर्षी मला विधानसभेचे तिकीटही मिळाले होते. राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यात मी सलग चार दशके पक्षाचे काम सांभाळत आहे. त्यामुळे हा प्रवास सहजासहजी झालेला नाही. राज्यातील प्रत्येक मतदारसंघाची खडान् खडा माहिती मला आहे. अशा स्थितीत कोण काय बोलते किंवा काय तर्क लावते, याकडे लक्ष देण्याची सध्या वेळ नाही.”
https://prahaar.in/2026/08/07/ajinkya-rahanes-new-innings-no-coaching-or-commentary-after-retirement-now-he-will-take-up-this-major-role/
सर्वेक्षण ही पक्षाची जुनीच पद्धत
प्रशांत किशोर यांच्या कंपनीमार्फत राष्ट्रवादीकडून जिल्हावार सर्वेक्षण केले जात असल्याच्याही चर्चा आहेत. त्यावर बोलताना तटकरे म्हणाले की, पक्ष विस्तारासाठी किंवा जागांच्या चाचपणीसाठी अंतर्गत सर्वेक्षण करणे ही काही नवीन गोष्ट नाही. पूर्वी शरद पवार साहेबांना प्रत्येक जिल्ह्यातील १०-१२ प्रमुख कार्यकर्त्यांची नावे आणि तिथली राजकीय स्थिती तोंडपाठ असायची. अजितदादाही तशाच प्रकारे राज्यातील कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना वैयक्तिकरित्या ओळखतात. पक्ष मजबूत करण्यासाठी व्यावसायिक पद्धतीने सर्वेक्षण करण्यात काहीही वावगे नाही. सध्याच्या बदलत्या काळात आम्ही सर्वजण त्याच आधुनिक आणि संघटित पद्धतीने काम करत आहोत, असे सांगत तटकरे यांनी प्रशांत किशोर यांच्या भेटीला राजकीय रंग न देण्याचे आवाहन केले.