मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात करण्यासाठी एक नवा, पर्यावरणपूरक मार्ग स्वीकारला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने या परिसरात कपडे उकळण्याच्या भट्ट्यांसाठी १५० ‘पाइप्ड नॅचरल गॅस’ (PNG) जोडण्या कार्यान्वित करण्याची मोहीम वेगाने सुरू आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला लाकूड आणि दगडी कोळशाचा धूर निर्माण करणारा पारंपरिक वापर आता पूर्णपणे थांबणार आहे.
धुराच्या समस्येतून धोबी बांधवांची आणि परिसराची सुटका
महालक्ष्मी धोबीघाटात दररोज हजारो कपडे स्वच्छ करण्यासाठी आणि ते उकळण्यासाठी शेकडो भट्ट्यांमध्ये प्रचंड प्रमाणावर कोळसा अन् लाकूड जाळले जायचे. परिणामी, महालक्ष्मी आणि सात रस्ता परिसरात कायम धुराचे लोट पसरलेले असायचे. या हवेच्या प्रदूषणामुळे येथे पिढ्यानपिढ्या कष्ट करणाऱ्या धोबी बांधवांना तसेच आसपासच्या रहिवाशांना दमा, तीव्र खोकला आणि श्वासोच्छवासाच्या गंभीर आजारांचा सामना करावा लागत होता. आता पीएनजी गॅसचा पुरवठा सुरू झाल्याने हा संपूर्ण परिसर धूरमुक्त होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.
पर्यावरणाचे रक्षण अन् पैशांचीही होणार मोठी बचत
पर्यावरण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, इंधनात झालेल्या या बदलामुळे महालक्ष्मी परिसरात दरवर्षी होणारे सुमारे १५० टन कार्बन डायऑक्साइडचे (CO2) उत्सर्जन रोखले जाणार आहे. तसेच लाकूड किंवा कोळशाच्या तुलनेत पीएनजी गॅस केवळ सुरक्षित आणि स्वच्छ नसून तो आर्थिकदृष्ट्याही अत्यंत परवडणारा आहे. गॅसच्या वापरामुळे कपडे जलद गतीने उकळले जात असल्याने धोबी बांधवांच्या इंधनावरील खर्चात कपात होणार असून त्यांच्या वेळेचीही मोठी बचत होत आहे.
हायकोर्टाच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाची ‘क्लीन एअर’ मोहीम
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार महापालिकेच्या पर्यावरण विभागाने शहरातील बेकरी, स्मशानभूमी आणि धोबीघाट अशा व्यावसायिक ठिकाणांवरून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सीएनजी, पीएनजी किंवा विद्युत जोडणी अनिवार्य करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. पालिकेच्या ‘क्लीन एअर प्रोजेक्ट’ मधील हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि यशस्वी टप्पा मानला जात आहे.
पहिल्या टप्प्यात १५० व्यावसायिकांना दिलासा
महालक्ष्मी धोबीघाटात एकूण ७३२ व्यावसायिक कार्यरत असून पहिल्या टप्प्यामध्ये १५० जणांना गॅस जोडणी देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ‘धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास सहकारी संस्था लिमिटेड’चे अध्यक्ष संतोष कनोजिया यांनी स्पष्ट केले की, गॅस वितरण कंपनीच्या काही तांत्रिक कारणांमुळे कामाची गती थोडी संथ झाली होती, परंतु या उपक्रमामुळे येथील सर्व व्यावसायिकांचे आरोग्य सुरक्षित राहणार असून त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.