सिंधुदुर्ग : कोकणात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आणि नागरिकांसाठी एक अत्यंत सावध करणारी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. देवगड तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कुणकेश्वर येथील खालचीवाडी परिसरातील रहिवासी असलेल्या चेतन मोहन परब (३५) यांचा समुद्राच्या उधाणाच्या पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुणकेश्वर आणि संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
https://prahaar.in/2026/08/06/shrinivas-vinayak-kulkarni-a-brilliant-era-in-marathi-literature-has-come-to-an-end-the-chief-minister-paid-tribute-to-shri-v-kulkarni-editor-of-mauj-magazine-and-author-of-doh/
नेमकं काय घडलं?
बुधवारी मध्यरात्री ११ वाजण्याच्या सुमारास चेतन परब हे आपल्या काही मित्रांसोबत कुणकेश्वर ते मिठमुंबरी मार्गावरील समुद्रकिनारी खेकडे पकडण्यासाठी गेले होते. रात्रीच्या वेळी किनाऱ्यावरील खडकांवरून चालताना अचानक चेतन यांचा पाय घसरला आणि ते खोल पाण्यात कोसळले. सध्या समुद्राला मोठे उधाण आणि तीव्र लाटा असल्यामुळे ते क्षणात पाण्याच्या शक्तिशाली प्रवाहाबरोबर खोल समुद्रात वाहून गेले.
सोबत असलेल्या मित्रांनी त्यांना वाचवण्याचा आणि शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र रात्रीचा अंधार आणि उसळणाऱ्या तीव्र लाटांमुळे त्यांना यश आले नाही.
https://prahaar.in/2026/08/06/jos-buttler-makes-waves-in-the-cricketing-world-surpasses-pollard-to-become-the-highest-run-scorer-in-t20s/
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असलेल्या चेतन परब यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या तरुणाचा अशा प्रकारे अचानक अंत झाल्याने परब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रात्रीच्या वेळी किंवा उधाणाच्या काळात समुद्रकिनाऱ्यांवर जाताना नागरिकांनी आणि पर्यटकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.