नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील सलग गदारोळ आणि कामकाज थांबल्याचा तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी विरोधकांशी चर्चेची पावले उचलली आहेत. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची संसदेतील कार्यालयात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे ५० मिनिटे चर्चा झाली. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सरकारकडून सहकार्य मागण्यात आले असून, हा एक ‘विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न’ असल्याचे सूत्रांनी सांगितले.
https://prahaar.in/2026/08/05/central-government-prepares-to-hold-a-special-session-for-the-delimitation-and-womens-reservation-bills-kiren-rijiju-and-rahul-gandhi-meet/
या बैठकीला काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा, गौरव गोगोई आणि के. सी. वेणुगोपाल हे देखील उपस्थित होते. बैठकीत प्रस्तावित सीमांकन विधेयक आणि वादग्रस्त ‘एफसीआरए’ विधेयकासह सर्व प्रलंबित मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या १० दिवसांत रिजिजू यांची गांधींसोबतची ही दुसरी भेट आहे. राहुल गांधींच्या भेटीनंतर रिजिजू यांनी गृहमंत्री अमित शाह यांचीही संसदेत भेट घेतली. या अधिवेशनात विरोधी पक्ष सातत्याने गृहमंत्र्यांच्या उपस्थितीची मागणी करत आहेत.
https://prahaar.in/2026/08/05/special-bench-for-the-speedy-resolution-of-contentious-waqf-registration-cases/
२० जुलैपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या गदारोळांमुळे लोकसभेत एकदाही प्रश्नोत्तर काळ पूर्ण होऊ शकलेला नाही. गोंधळादरम्यानच आतापर्यंत ५ विधेयके विनाचर्चा संमत करण्यात आली आहेत. नीट प्रकरणातील आंदोलकांवर झालेल्या दिल्ली पोलिसांच्या कारवाईविरोधात आणि पंतप्रधान व गृहमंत्र्यांच्या निवेदनासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, एफसीआरए संसदेत चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी येईल, तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सभागृहात यावर सविस्तर बोलतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या १३ ऑगस्ट रोजी संपणार असलेल्या या अधिवेशनात विरोधकांशी संवाद साधून कामकाज सुरळीत चालवण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे.