नवी दिल्ली : हवामान विभागाने देशभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेशातही जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य भारत, कोकण, गोवा, केरळ आणि किनारपट्टीच्या कर्नाटकात मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो.
https://prahaar.in/2026/08/03/brij-bhushan-sharan-singh-acquitted-in-sexual-exploitation-case/
नैऋत्य राजस्थानवरील कमी दाबाचे क्षेत्र कमकुवत झाले असले तरी मान्सूनचा पट्टा सक्रिय आहे. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील २७३ मदत छावण्यांमध्ये ७६०० हून अधिक नागरिकांना आश्रय देण्यात आला आहे. प्रशासनाकडून स्वच्छता आणि रोगराई नियंत्रण मोहीम राबवली जात आहे. केरळमधील सर्व १४ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला असून आठवड्याच्या उत्तरार्धात उत्तरेकडील जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडू शकतो.
आसाममधील महापुरामुळे मृतांची संख्या ८२ वर पोहोचली असून ७८ लाख लोक प्रभावित झाले आहेत. संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छ भागातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक धरणे ओसंडून वाहत आहेत.
https://prahaar.in/2026/08/03/bjps-30-year-stronghold-crumbles-prashant-kishor-tastes-victory-in-bihar-congress-triumphs-in-madhya-pradesh-bjp-retains-its-bastion-in-gujarat/
ऑगस्ट महिन्यात देशातील बहुतांश भागांत सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रात्रीच्या वेळी हवामान उष्ण आणि दमट राहील. पॅसिफिक महासागरात एल निनोची स्थिती कायम असून ती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मात्र, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि इतर अनुकूल घटकांमुळे मान्सूनवर एल निनोचा विपरीत परिणाम कमी दिसून येत आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, भारतातील पावसाचे स्वरूप आता केवळ एल निनोवर अवलंबून राहिलेले नाही. हवामान बदलाच्या या काळात आपत्ती व्यवस्थापन आणि पूर्वअंदाज यंत्रणा अधिक बळकट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. धोकादायक भागातील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/08/03/maharashtra-holds-a-significant-position-in-school-education-at-the-national-level-chief-minister-devendra-fadnavis/
मुंबईसह कोकणपट्ट्यात मध्यम पाऊस
वायव्य भारतावर नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होत असल्याने या भागात ४ ऑगस्टपासून पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. मुंबई आणि परिसरात अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. पालघर, ठाणे आणि उर्वरित कोकण पट्ट्यातही मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.