दरवर्षी १ ऑगस्ट रोजी क्रांतिसूर्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. १ ऑगस्ट १९२० रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे खूप मोलाचे योगदान होते. टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते.
एक काळ असा होता, जेव्हा आपल्याच देशात आपल्या हक्कांबद्दल बोलणे म्हणजे गुन्हा मानला जायचा.अशा घनघोर अंधारात एक तांबडं फुटलं आणि सिंहगर्जनेचा आवाज घुमला, “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” ही केवळ घोषणा नव्हती, तर गुलामगिरीच्या भिंतींना तडे देणारा एक महामंत्र होता. हा मंत्र देणारे महापुरुष म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक!
१ ऑगस्ट रोजी या क्रांतिसूर्याची पुण्यतिथी. या निमित्ताने राज्यात, शाळेत अनेक कार्यक्रम आणि वकृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यानिमित्ताने भाषण करण्यासाठी प्रमुख मुद्दे आणि त्यावर आधारित भाषणाचा एक नमुना आम्ही तुम्हाला देणार आहोत.
https://prahaar.in/2026/08/01/jalgaon-crime-uncontrollable-rage-over-sisters-love-marriage/
शालेय विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवणारे आणि व्यासपीठ गाजवणारे एक सुंदर, सोपे व प्रभावी भाषण आहे. याचा वापर केला तर शाळेत सर्वजण तुमचे कौतुक करतील.
लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्तानं भाषणाचे ५ प्रमुख मुद्दे:
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे – सिंहगर्जनेमागची ताकद.
इंग्रजांना थेट आव्हान देणारे धाडसी पत्रकार.
‘लोकमान्य’ ही पदवी आणि जनतेशी जोडले गेलेले नाते.
गणेशोत्सव आणि शिवजयंती: समाजाला एकत्र आणण्याची नवी संकल्पना.
आजच्या युगात टिळकांच्या विचारांची गरज.
https://prahaar.in/2026/08/01/changes-to-nashiks-central-traffic-today-which-routes-will-be-closed/
भाषण नमुना :
आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो!
आज 1 ऑगस्ट, 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या महामानवाने जगाचा निरोप घेतला. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत.
मित्रांनो, इंग्रज ज्यांना घाबरायचे, ती व्यक्ती म्हणजेच आपले लोकमान्य टिळक. इंग्रजांनी त्यांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हटले. पण देशातील जनतेने त्यांना प्रेमाने आणि आदराने ‘लोकमान्य’ ही पदवी दिली, ज्याचा अर्थ होतो ‘लोकांनी मान्य केलेला नेता’.
टिळकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची दूरदृष्टी. लोकांना एकत्र आणल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही, हे त्यांनी सर्वात आधी ओळखले. यासाठी त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे सण सार्वजनिक स्वरूपात साजरे करायला सुरुवात केली. चार भिंतींत असलेला सण रस्त्यावर आला आणि इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी अख्खा समाज एकत्र आला.
पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी इंग्रज सरकारला पळता भुई थोडी केली. ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांतून त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखांनी लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी टाकली. इंग्रजांनी त्यांना रोखण्यासाठी 6 वर्षांची मंडालेच्या तुरुंगात सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. पण तुरुंगातील अंधारही त्यांचा उत्साह कमी करू शकला नाही. तिथे राहून त्यांनी ‘गीतारहस्य’ हा अजरामर ग्रंथ लिहिला.
https://prahaar.in/2026/08/01/case-registered-against-congress-leader-bhai-jagtap-over-ai-generated-video-maharashtra-cyber-police-have-initiated-an-investigation/
टिळकांचे जीवन आपल्याला शिकवते की, अन्याय सहन करणे हा सर्वात मोठा अपराध आहे. आज आपण स्वतंत्र भारतात जगत आहोत. पण आजचा ‘स्वराज्य’ म्हणजे काय? तर दारिद्र्य, अज्ञान आणि भ्रष्टाचारापासून मुक्ती! शिक्षण हेच प्रगतीचे मुख्य साधन आहे, असा टिळकांचा ठाम विश्वास होता.
आज लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वांनी एक नवीन संकल्प केला पाहिजे. आपण केवळ पुस्तकी ज्ञान न घेता, सत्य, धाडस आणि देशसेवेची मूल्ये अंगीकारली पाहिजेत. आजच्या काळात लोकमान्य टिळकांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल, तर आपण एक सुजाण, प्रामाणिक आणि देशभक्त नागरिक बनले पाहिजे.
इतके बोलून मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र! लोकमान्य टिळकांना विनम्र अभिवादन!