कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे (वय ५०) यांच्या हत्येने संपूर्ण परिसर हादरला आहे. कथित प्रेमसंबंध आणि लग्नाच्या वादातून त्यांचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणी त्यांचे कथित प्रियकर प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील (वय ४०) याला भिवंडीतील नारपोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत संशयिताने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.(kolhapur Crime)
https://prahaar.in/2026/07/27/ulhasnagar-shaken-mother-strangles-20-year-old-daughter-to-death-following-a-dispute-over-an-inter-caste-relationship/
पोलिसांच्या माहितीनुसार, सुरेखा न्यारे आणि प्रकाश पाटील हे दोघेही शिरगावचे रहिवासी असून दोन्ही कुटुंबांमध्ये पूर्वीपासून जवळचे संबंध होते. शेतातील कामांच्या निमित्ताने त्यांची ओळख वाढली आणि त्यातून दोघांमध्ये कथित प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, सुरेखा यांनी लग्नासाठी सातत्याने दबाव टाकत असल्याने प्रकाश नाराज होता. याच कारणातून त्याने हत्या केल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले.(kolhapur Crime)
रविवारी सकाळी प्रकाशने “पंढरपूरच्या वारीला जाऊया” असे सांगून सुरेखा यांना आपल्या कारमधून गावाबाहेरील लिंडोरी येथील शेतातील जनावरांच्या गोठ्यात नेले. तेथे संधी साधून त्याने त्यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह मुंबईतील समुद्रात फेकण्याचा कटही आखण्यात आला.(Kolhapur Crime)
हत्येनंतर प्रकाश भिवंडी तालुक्यातील कशेळी येथे पोहोचला आणि आपल्या भाचा संदेश याला फोन करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा बेत सांगितला. मात्र, संदेश याने तत्काळ पोलिसांना माहिती दिल्याने संपूर्ण कट उधळला गेला. नारपोली पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंतर या घटनेची माहिती शाहूवाडी पोलिस ठाण्याला देण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.(Kolhapur Crime)
गेली अडीच वर्षे सुरेखा न्यारे या शिरगावच्या सरपंच म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या हत्येने गावासह संपूर्ण शाहूवाडी तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, या धक्कादायक घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.(Kolhapur Crime)