५३.३८ टक्के पाणीसाठा; मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम
मुंबई : राज्यातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत असून, राज्यातील एकूण ३ हजार २९ धरणांमध्ये ५३.३८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक धरणे भरली असली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने एकूण साठ्यात १० टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वरूणराजाची जोरदार कृपा झाली असली, तरी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
https://prahaar.in/2026/07/25/the-ocean-cleanup-interceptor-pilot-project-launched-in-malad-to-intercept-floating-waste/
राज्यात गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत सर्व जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या ६३.४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, तर यंदा तो ५३.३८ टक्के इतकाच आहे. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात १०.०४ टक्क्यांची तफावत पाहायला मिळत आहे. विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार केल्यास, कोकण विभागातील जलाशयांमध्ये सर्वाधिक ७६.५४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यापाठोपाठ पुणे विभागात ६५.२७ टक्के आणि नाशिक विभागात ५५.११ टक्के साठा झाला आहे. विदर्भातील नागपूर आणि अमरावती विभागात अनुक्रमे ४६.७१ टक्के आणि ४२.९१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
दुसरीकडे, मराठवाड्यात मात्र पावसाने अजूनही अपेक्षित जोर पकडलेला नाही. छत्रपती संभाजीनगर विभागातील मुख्य जलाशयांमध्ये केवळ २५.४४ टक्के पाणीसाठा असून, तेथील लघु प्रकल्पांमध्ये तर अवघा १३.८६ टक्के साठा राहिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या हलक्या ते मध्यम सरींनंतरही मराठवाड्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली नाही.
https://prahaar.in/2026/07/25/he-set-out-in-the-pre-dawn-darkness-and-in-an-instant-everything-was-lost/
मुंबईकरांसाठी दिलासा
दरम्यान, मुंबई आणि ठाणे परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. शुक्रवारी सकाळी ६ ते शनिवारी सकाळी ६ या २४ तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ प्रमुख तलावांमधील एकूण जलसाठा आता ८३.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे.