Nashik : ‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन ग्रीन मान्सून’ला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अभियानाच्या पाचव्या टप्प्यात क्यूआर कोडद्वारे नोंदणी केलेल्या नागरिकांना आता त्यांच्या प्रभागातून देशी प्रजातींची रोपे वितरित केली जाणार आहेत. आतापर्यंत ८,७५० रोपांची मागणी नोंदविण्यात आली असून, शहराला अधिक हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या मोहिमेला नागरिकांचा मोठा सहभाग लाभत आहे.
https://prahaar.in/2026/07/24/floodwaters-reach-the-face-of-the-dutondya-maruti-idol/
वृक्षलागवडीसोबतच संवर्धनावरही विशेष भर
राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या अभियानात नागरिकांना त्यांच्या परिसरात वृक्षारोपण करता यावे, यासाठी विशेष क्यूआर कोड नोंदणी प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली होती. या उपक्रमाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर आता नोंदणीकृत नागरिकांना प्रभागनिहाय देशी प्रजातींची रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले असून, संबंधित नगरसेवक, कार्यकर्ते, भूप्रहरी आणि नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून रोपांचे वितरण केले जाणार आहे. वृक्षलागवडीसोबतच त्यांच्या संवर्धनावरही विशेष भर देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मिशन ग्रीन मान्सून’च्या पहिल्या चार टप्प्यांत शहर आणि परिसरात २५ हजारांहून अधिक देशी वृक्षांच्या लागवडीला प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात सातपूर देवराई आणि शिंदे ग्रामपंचायत परिसरात ५ हजार वृक्ष, दुसऱ्या टप्प्यात मसरूळ वनराई (पिकॉक हिल) आणि त्र्यंबक रोडवरील ग्रेप काउंटी परिसरात ६ हजार वृक्ष, तिसऱ्या टप्प्यात ऐतिहासिक नंदिनी नदीच्या दोन्ही तीरांवर ६ हजार वृक्ष, तर चौथ्या टप्प्यात दऱ्याई माता परिसर, दरी येथे ५ हजार आणि पुणे विद्यापीठ उपकेंद्र, नाशिक येथे २ हजार वृक्षांच्या लागवडीचा प्रारंभ करण्यात आला.
https://prahaar.in/2026/07/24/heavy-rainfall-continues-in-mumbai-bmc-imposes-a-10-water-cut-even-as-four-lakes-overflow/
गिरीश महाजन यांचा वृक्षारोपणात सहभाग
या अभियानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक रविवारी ना. गिरीश महाजन स्वतः विविध ठिकाणी उपस्थित राहून वृक्षारोपणात सहभाग घेत आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे वृक्षप्रेमी, स्वयंसेवी संस्था, युवक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांचा सहभाग वाढत असून, ही मोहीम लोकचळवळीचे स्वरूप धारण करत आहे.प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त सहभागातून ‘मिशन ग्रीन मान्सून’ ही पर्यावरण संवर्धनाची व्यापक लोकचळवळ बनत असून, नाशिकला देशातील सर्वाधिक वृक्षसंपन्न आणि पर्यावरणपूरक शहर म्हणून नवी ओळख मिळवून देण्याच्या दिशेने हे अभियान वेगाने पुढे जात आहे.
https://prahaar.in/2026/07/23/maharashtras-first-isha-gramotsav-to-be-organized-in-nashik/
वृक्ष लावण्याइतकेच त्यांचे संवर्धन करणेही महत्त्वाचे
हरित नाशिक हा केवळ शासनाचा नव्हे, तर प्रत्येक नाशिककराचा संकल्प आहे. नागरिकांनी क्यूआर कोडद्वारे मोठ्या प्रमाणावर रोपांची मागणी करून या उपक्रमाला दिलेला प्रतिसाद समाधानकारक आहे. वृक्ष लावण्याइतकेच त्यांचे संवर्धन करणेही महत्त्वाचे आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिकला देशातील सर्वात हरित, स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्याचा आपला निर्धार आहे. मंत्री गिरीश महाजन