पालघर : पालघर जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जोरदार पावसाचा अंदाज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी गुरुवार, 23 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. सखल भागांमध्ये पाणी साचण्याची आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. (Palghar)
https://prahaar.in/2026/07/23/orange-alert-for-5-districts-including-mumbai-thane-and-raigad-warning-of-heavy-rain-for-the-next-3-hours/
आज शाळेला सुट्टी
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार सर्व अंगणवाड्या, शासकीय आणि खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, आश्रमशाळा तसेच सर्व महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये आज विद्यार्थ्यांना सुट्टी राहणार आहे. मात्र, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला मदत करण्यासाठी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात उपलब्ध राहावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. (Palghar Rain)
https://prahaar.in/2026/07/23/heavy-rainfall-to-continue-in-pune-for-the-next-3-days-red-alert-issued-for-the-ghat-areas-citizens-urged-to-remain-alert/
झाई गावात पूरस्थिती
दरम्यान, जिल्ह्यातील डहाणू (Dahanu) आणि तलासरी तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुजरात-महाराष्ट्र (Gujrat- Maharashtra) सीमेवरील झाई गावातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले असून नागरिकांना मोठा फटका बसला आहे. कासा परिसरात नाल्याला आलेल्या पुरामुळे गायकवाड पाड्यातील एक कुटुंब काही काळ अडकून पडले होते. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी 3 ते 4 घरे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Palghar School Holiday)
झाई-बोर्डी मार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास किनारपट्टीवरील गावांवर अधिक परिणाम होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. (Monsoon Update)
सततच्या पावसामुळे नद्या, नाले आणि ओढ्यांची पाणीपातळी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी धबधबे, नदीपात्र आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. (Rain Update)