धाराशिव : धाराशिवमध्ये शेगावच्या संत गजानन महाराजांच्या वारीदरम्यान मोठी दुर्घटना टळली आहे. भाविकांना वाटण्यासाठी आणलेल्या शीतपेय (Cold Drink) चे सेवन केल्यानंतर दोन परिचारिका (Nurses) विषबाधाग्रस्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना वेळेत उघडकीस आल्याने हजारो वारकऱ्यांवर ओढावणारा संभाव्य धोका टळला.
विषबाधा झालेल्या परिचारिकांची नावे पूजा जाधव आणि पल्लवी सौदागर अशी आहेत. वारीत वाटप (Distribution) करण्यापूर्वी त्यांनी शीतपेयाची चाचणी म्हणून सेवन केले. त्यानंतर दोघींची प्रकृती अचानक बिघडली. पूजा जाधव यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर लातूर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. तर पल्लवी सौदागर यांच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
https://prahaar.in/2026/07/13/ashadhi-wari-2026-thieves-run-rampant-during-the-palkhi-procession-89-suspects-including-67-women-and-22-men-taken-into-police-custody/
घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन (FDA), पोलीस आणि सरकारी रुग्णालयातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी वारीत वाटपासाठी आणलेल्या शीतपेयाच्या सर्व बाटल्या जप्त (Seize) करत पुढील तपास सुरू केला आहे. या तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, संबंधित शीतपेय (Cold Drink) नेमके कुठून आणण्यात आले होते, ते कोणत्या कंपनीचे (Company) होते, त्याचे वाटप कोण करणार होते आणि त्यामध्ये विषारी किंवा दूषित पदार्थ कसा आला, याचा तपास पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) संयुक्तपणे करत आहेत. तपास अहवालानंतरच या प्रकरणामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.