Akanksha Chamola : टीव्ही अभिनेता गौरव खन्ना (Gaurav Khanna) आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला (Akanksha Chamola) यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लॉक अप २’च्या नव्या भागात आकांक्षाने त्यांच्या नात्यात दुरावा येण्यामागचं कारण प्रथमच स्पष्ट केलं. शोमध्ये श्रेया कालरा (Shreya Kalra) आणि सूफी मोतीवाला (Sufi Motiwala) यांच्याशी संवाद साधताना आकांक्षा म्हणाली की, लग्नाच्या सुरुवातीला तिला आई होण्याची इच्छा नव्हती. कालांतराने तिला आपण कधीच आई बनू इच्छित नसल्याची खात्री झाली. सुरुवातीला गौरव तिच्या निर्णयाशी सहमत होता, मात्र नंतर त्याची मुलं होण्याची इच्छा वाढली.
https://prahaar.in/2026/06/30/no-relief-for-asaram-from-the-supreme-court/
मला आई व्हायचं नाही
श्रेया कालराने आकांक्षाला विचारले की, भविष्यात तिला कधी मूल होण्याची इच्छा आहे का? यावर आकांक्षाने स्पष्टपणे उत्तर दिले, “कधीच नाही. माझ्या मनात आई होण्याची भावना नाही. मला जेव्हा जाणवलं की मी मातृत्वासाठी तयार नाही, तेव्हाच मी गौरवला याबद्दल स्पष्ट सांगितलं होतं. आकांक्षा पुढे म्हणाली, मला जेव्हा पूर्ण खात्री झाली की मला आई व्हायचं नाही, तेव्हा मी गौरवला स्पष्ट सांगितलं की मी हे करू शकत नाही. मी त्याला हेही सांगितलं होतं की, जर त्याला मूल हवं असेल, तर तो मला सोडू शकतो.”
संवादादरम्यान आकांक्षाने पुढे सांगितले, मी त्यांची भूमिकाही समजू शकते, कारण अनेक नात्यांमध्ये हा मोठा मुद्दा ठरू शकतो. खरं सांगायचं तर, बहुतेक लोक लग्न करतात ते कुटुंब वाढवण्यासाठी आणि मुलं होण्यासाठी. त्यामुळे जर त्यांची मूल होण्याची इच्छा असेल, तर त्यात त्यांची काहीही चूक नाही. ती पुढे म्हणाली की, ‘बिग बॉस’च्या काळात तिला गौरवला वडील होण्याची तीव्र इच्छा असल्याचं जाणवलं. मात्र स्वतःला मातृत्व स्वीकारायचं नसल्याने दोघांनी परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
https://prahaar.in/2026/06/28/actor-satendra-soni-shocking-allegation-by-laapataa-ladies-actor-satendra-soni-assaulted-after-asking-for-his-remuneration-thrown-out-of-the-hotel/
आकांक्षाचा ‘चाइल्ड-फ्री’ आयुष्य जगण्याचा निर्णय
भविष्यात मूल दत्तक घेण्याच्या प्रश्नावरही आकांक्षाने स्पष्ट भूमिका मांडली. “मी जाणीवपूर्वक ‘चाइल्ड-फ्री’ आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे. मला कोणत्याही मुलाची जबाबदारी घ्यायची नाही. मला माझं आयुष्य माझ्या अटींवर आणि स्वतंत्रपणे जगायचं आहे,” असं ती म्हणाली.
याआधी ‘लॉक अप २’च्या (‘Lock Upp 2’) प्रीमियरमध्ये आकांक्षाने आपण आणि गौरव गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत असल्याचं आणि परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं होतं. दोघांमध्ये कोणताही वाद किंवा कटुता नसून, भविष्याबाबतची वेगवेगळी भूमिका हेच त्यांच्या विभक्त होण्यामागचं मुख्य कारण असल्याचं तिने स्पष्ट केलं.