न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर (Nasarapur) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (Sunetra Pawar) यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करत त्यांनी न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे म्हटले आहे.
सुनेत्रा पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सांगितले की, या प्रकरणाची सुनावणी अवघ्या दोन महिन्यांत पूर्ण करून न्यायालयाने निकाल दिला. त्यामुळे न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत वेग आणि प्रभावीपणा दिसून आला आहे.
https://prahaar.in/2026/06/29/muktainagar-leopard-beating-incident-grandstanding-while-handling-the-leopard-will-not-be-tolerated-strict-action-will-be-taken-against-the-guilty/
त्यांनी म्हटले की, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करणाऱ्या व्यक्तींना समाजात कोणतेही स्थान नसावे. या निकालामुळे कायद्याचा धाक निर्माण होईल आणि भविष्यात अशा गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महिला, मुली आणि बालकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असून अशा प्रकरणांमध्ये तपास यंत्रणा आणि प्रशासन पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच या खटल्यात काम करणाऱ्या सरकारी वकिलांचे त्यांनी आभार मानले.
https://prahaar.in/2026/06/29/nasrapur-case-bhimrao-kamble-the-accused-in-the-nasrapur-atrocity-case-sentenced-to-death/
या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने विशेष तपास पथक स्थापन करून तपास पूर्ण केला. त्याबद्दल पोलिसांचेही सुनेत्रा पवार यांनी कौतुक केले.
समाज आणि सरकार यांनी एकत्रितपणे महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगत अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.