राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुंबई आणि नागपूरमधील महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे दोन्ही शहरांतील प्रवाशांना भविष्यात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
https://prahaar.in/2026/06/26/ayodhya-ram-mandir-donation-scam-new-twist-in-the-case-champat-rai-and-anil-mishra-resign/
मुंबईमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूला (Swatantryaveer Savarkar Sea Link) वांद्रे किल्ला परिसराशी जोडण्यासाठी सुमारे ३.५५ किलोमीटर लांबीचा नवीन कनेक्टर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १,७२२.४० कोटी रुपयांचा खर्च होणार असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत त्याची अंमलबजावणी केली जाईल. हा कनेक्टर तयार झाल्यानंतर सध्या २० ते ४५ मिनिटे लागणारा प्रवास अवघ्या १० मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सोयीचा होईल.
दुसरीकडे, नागपूर मेट्रो रेल टप्पा-२ अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या मार्गावर १.४० किलोमीटर लांबीची उन्नत मेट्रो मार्गिका उभारण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. या मार्गावर एक नवीन मेट्रो स्थानक उभारण्यात येणार असून या प्रकल्पासाठी सुमारे ३१०.३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामाची जबाबदारी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) यांच्याकडे असणार आहे.
https://prahaar.in/2026/06/26/nashik-fire-brigades-strength-to-be-boosted-ahead-of-simhastha/
नागपूर मेट्रो विस्तार प्रकल्पाला केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबई आणि नागपूरमधील वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होईल. तसेच नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी करण्याच्या दृष्टीने हे दोन्ही प्रकल्प महत्त्वाचे मानले जात आहेत.