Crime News : सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी सरकार विविध योजना राबवत असते. मात्र या योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळीच मंडळी पुढे येते. आणि योजनेची मिळण्यासाठी काही रक्कम द्या म्हणून लाच मागते. असाच एक प्रकार जामनेर येथे घडला आहे. शासनाच्या विहीर अनुदान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जामनेर पंचायत समितीतील कंत्राटी तांत्रिक सहाय्यकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर अशोक नावकर (३२) असे गुन्हा दाखल झालेल्या कंत्राटी तांत्रिक सहाय्यकाचे नाव आहे. दरम्यान या घटनेमुळे शेतकरी वर्गात संतापाची भावना व्यक्त होत आहे.
https://prahaar.in/2026/06/23/impact-of-tension-in-hormuz-crude-oil-prices-rise-again-check-the-new-rates-for-petrol-and-diesel/
नेमकं प्रकरण काय ?
हा संपूर्ण प्रकार जामनेर (Jamner) येथे घडला आहे. तक्रारदार शेतकऱ्याची जामनेर तालुक्यात शेती आहे. शासनाच्या योजनेअंतर्गत त्यांना विहिरीचे अनुदान मंजूर झाले होते. विहीर मंजुरीनंतर प्रत्यक्ष त्या जागेची पाहणी करायची त्यानंतर तांत्रिक अहवाल सादर करणे आणि अनुदानाच्या पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करायची ही जबाबदारी तांत्रिक सहाय्यकाकडे होती. याचा फायदा सागर अशोक नावकरने उचलला.
आरोपानुसार, विहिरीच्या प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यापूर्वीच सागर नावकर (Sagar Navkar) यांनी ग्रामरोजगार सेवकाच्या माध्यमातून तक्रारदाराकडून तब्बल ३० हजार रुपयांची रक्कम स्वीकारली होती. त्यानंतर त्यांनी विहिरीच्या जागेची पाहणी केली, छायाचित्रे घेतली आणि संबंधित प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगितले. या प्रक्रियेनंतर तक्रारदाराला पंचायत समितीमार्फत टप्प्याटप्प्याने ६० हजार ९६६ रुपयांचे अनुदान प्राप्त झाले.भस्मासुराप्रमाणे आरोपींची भूक काही मिटली नाही त्यांनी पुन्हा लाचेची मागणी केली.
https://prahaar.in/2026/06/23/a-journalists-question-sparks-a-heated-exchange-riteish-deshmukhs-video-goes-viral/
पुन्हा ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी
उर्वरित अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी तक्रारदाराने पुन्हा तांत्रिक सहाय्यकाची भेट घेतली. त्यावेळी विहिरीची जागा बदलण्यात आल्याचे कारण पुढे करत पुढील अनुदान मंजूर करून देण्यासाठी आणखी ३० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करण्यात आली. संबंधित रक्कम दिल्याशिवाय उर्वरित अनुदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही असे तक्रारदाराला सांगण्यात आले. पैशांची पुन्हा व्यवस्था करणे शक्य नसल्याने तक्रारदाराने अखेर जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti-Corruption Bureau) धाव घेतली.
६ एप्रिल रोजी तक्रारदार शेतकऱ्याने अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीची विभागानेही गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली. त्यानंतर नियमानुसार पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान पंचांसमक्ष तांत्रिक सहाय्यकाने उर्वरित अनुदान मिळवून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पडताळणी अहवालाच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवत जामनेर पोलीस ठाण्यात (Jamner Police Station) सागर नावकर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला.
https://prahaar.in/2026/06/23/suspicious-death-of-a-doctor-at-a-renowned-hospital-in-nagpur-suspected-injection-overdose/
शासनाच्या योजनेत वाटा कशाला ?
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधित व्यवहार, अनुदान प्रक्रिया आणि यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान शासन खात्यातून वेतन सुरु असताना शासनाच्या योजनेत वाटा कशाला हवा हा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पारदर्शक व सुलभ व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असताना अशा प्रकारच्या घटनांमुळे योजनांबाबतचा विश्वास डळमळीत होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.