Nashik Vidhan Parishad Election : नाशिक विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे राज्यभरात चर्चांना उधाण आले असताना, निकालानंतर गोकुळ गिते यांनी दिलेली पहिली प्रतिक्रिया देखील तितकीच चर्चेची ठरत आहे. विशेष म्हणजे, विजयाचा आनंद व्यक्त करण्याऐवजी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेबाबत माफी मागत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
निकाल जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गोकुळ गिते यांनी मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले, 6 वर्षांचं या मतदारसंघाच्या आमदराकीचं टेन्युअर आहे. आणि अशा कालावधीमध्ये एक फिट उमेदवार जर लोकांना पाहिजे असेल तर तो त्यांना माझ्या रूपात मिळाला आणि अनफिट उमेदवार त्यांनी नाकारला, असं गीते म्हणाले.
https://prahaar.in/2026/06/22/girish-mahajan-on-gokul-gite-victory/
‘मी प्रचार थांबवला होता; कार्यकर्त्यांनी मात्र ऐकलं नाही’
गोकुळ गिते (Gokul Gite) यांनी निवडणुकीदरम्यान घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्या शब्दाला मान दिल्याचे सांगितले. मात्र कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळेच हा विजय शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. मी माझा प्रचार थांबवला होता. एकनाथ शिंदे आणि गिरीष महाजन यांच्या शब्दाला मान देऊन घरातच बसलो होतो. पण माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ऐकलं नाही, याबद्दल मी त्यांची माफी मागतो. पण माझ्या कार्यकर्त्यांनी हा जो विजय मला मिळवून दिला त्याबद्दल मी शतश: आभारी आहे, असं गोकुळ गीते विजयानंतर म्हणाले.
नरेंद्र दराडेंच्या आरोपांवर बोलणं टाळलं
निवडणुकीच्या निकालानंतर पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत विश्वासघात झाल्याचा आरोप केला होता. काही नेत्यांवर अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी केली होती. मात्र याबाबत प्रतिक्रिया विचारली असता गोकुळ गिते यांनी अत्यंत संयमित भूमिका घेतली.दराडे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता त्यांनी केवळ, “त्यांचं उत्तर तेच देतील,” एवढेच सांगितले. पुढील कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे संभाव्य वादाला त्यांनी सुरुवातीलाच पूर्णविराम दिल्याचे पाहायला मिळाले.
https://prahaar.in/2026/06/22/nashik-vidhan-parishad-election-3/
शिवसेनेत जाणार का? गितेंनी दिलं सावध उत्तर
निकालानंतर गोकुळ गिते यांना शिवसेना (शिंदे गट) कडून संपर्क साधण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, गिते यांचे निकटवर्तीय नाना गामने यांना मंत्री उदय सामंत यांनी दूरध्वनी करून संपर्क साधल्याची माहिती समोर आली होती. यानंतर गिते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनाही वेग आला.
मात्र याबाबत प्रश्न विचारला असता गोकुळ गिते यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका मांडण्यास नकार दिला. या सर्व चर्चांबाबत मला कोणतीही अधिकृत माहिती नाही. तुम्हाला काही माहिती असेल तर मला माहीत नाही. सध्या मी कोणत्याही निर्णयाच्या टप्प्यावर नाही, असे ते म्हणाले.
‘कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय नाही’
पुढील राजकीय वाटचालीबाबत बोलताना गिते यांनी आपल्या कार्यकर्त्यांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली. हा विजय केवळ त्यांचा नसून हजारो कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा विजय जरी माझ्या नावावर झाला असला तरी या विजयामागे असंख्य कार्यकर्त्यांचे कष्ट आहेत. त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कोणताही राजकीय निर्णय घेऊ शकत नाही. त्यांच्या भावना, त्यांचे मत आणि त्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतरच पुढील दिशा ठरवली जाईल, असे गिते म्हणाले.